भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने बीसीसीआयला पत्र लिहून प्रशिक्षक रमेश पोवार यांना पाठिंबा देताना त्यांना भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी कायम करण्याची विनंती केली होती.
तसेच तिने म्हटले आहे की पोवारांनी तांत्रिकदृष्या आणि रणनीतीकदृष्ट्याही भारतीय महिला संघाचा चेहरा बदलला आहे. तसेच त्यांनी भारतीय महिला संघाला प्रेरणाही दिली.
मात्र यानंतर आता तिच्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी कडक शब्दात टीका केली आहे. त्यांनी ट्विटवरुन टीका करताना म्हटले आहे की ‘हरमनप्रीतला आठवण करुन देणे गरजेचे आहे की जेव्हा वनडे विश्वचषकात भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला होता आणि तो विश्वचषक जवळजवळ जिंकलाच होता तेव्हा पोवार हे मुख्य प्रशिक्षक नव्हते.’
‘त्यामुळे पोवारांना काढल्याने आम्हाला परत सुरुवातीपासून सर्व सुरु करावे लागेल असे म्हणून ती कोणत्याही प्रशिक्षकाच्या संघातील भूमीकेबद्दल अतिशयोक्ती करत आहे.’
https://twitter.com/sanjaymanjrekar/status/1069914470057676800
रमेश पोवार यांना हरमनप्रीत कौरसह भारताच्या महिला टी20 संघाची उपकर्णधार स्म्रीती मानधनानेही पाठिंबा दिला आहे. या दोघींनीही पत्र लिहून हा पाठिंबा दर्शविला आहे.
कौरने पत्रात म्हटले आहे की, ‘मी, टी20 संघाची कर्णधार आणि वनडे संघाची उपकर्णधार म्हणून विनंती करते की पोवार यांना संघाचे प्रशिक्षक म्हणून कायम करा. पुढील टी20 विश्वचषकासाठी जवळ जवळ फक्त 15 महिने राहिले आहेत आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी 1 महिनाच उरला आहे.’
‘त्यांनी आम्हाला ज्याप्रकारे एक संघ म्हणून बदलले आहे, ते बघून मला वाटत नाही की त्यांना बदली करण्यासाठी कोणते कारण आहे.
तसेच तिने पुढे म्हटले आहे, ‘टी20 विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभव निराशाजनक होता. तसेच त्यानंतर जे वाद झाले ते पाहून जास्त वाईट वाटले. त्या सगळ्या प्रकरणामुळे आमची प्रतिमा आणि संघातील एकतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.’
‘सर रमेश पोवार यांनी आमची फक्त खेळाडू म्हणून सुधारणा घडवून आणली नाही, तर त्यांनी लक्ष्य निर्धारित करण्यासाठी आणि आमच्या स्वतःच्या मर्यादांना आव्हान देण्यासाठी प्रेरिकही केले. त्यांनी तांत्रिकदृष्या आणि रणनीतीकदृष्ट्याही भारतीय महिला संघाचा चेहरा बदलला आहे.’
तसेच कौरने असेही म्हटले आहे की प्रशिक्षक बदलल्याने संघाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होईल. ती म्हणाली, ‘परत प्रशिक्षक बदलीमुळे आमच्या प्रगतीवर परिणाम होईल आणि आम्हाला परत सुरुवातीपासून सुरु करावे लागेल.’
त्याचबरोबर कौरने मिताली राजला टी20 विश्वचषकातील इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यातून वगळण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असल्याचेही सांगितले आहे.