आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (२२ फेब्रुवारी) भारत आणि दक्षिण आफ्रिका समोरा-समोर येणार आहेत. सुपर-८चा हा सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. यामध्ये भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांमध्ये एक रोमांचक स्पर्धा दिसणार आहे. ज्यामुळे आर अश्विनचा मोठा विक्रम धोक्यात आला आहे.
भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यात टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याची शर्यत आहे. हा विक्रम सध्या अश्विनच्या नावावर आहे. त्याने २४ सामन्यात ३२ विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात जसप्रीत आणि अर्शदीप यांनी आतापर्यंत ३०-३० विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे दोघांनाही हा विक्रम मोडण्यासाठी ३-३ विकेट्सची आवश्यकता आहे. यामुळे सर्वात पहिले कोण हा विक्रम मोडेल यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. या शर्यतीत हार्दिक पांड्याही आहे.
हार्दिकने टी२० विश्वचषकात २९ विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे त्याला हा विक्रम मोडण्यासाठी ४ विकेट्सची आवश्यकता आहे. सध्याच्या स्पर्धेत पाहिले तर फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फॉर्ममध्ये आहे. त्याने ४ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच या स्पर्धेत ग्रुप स्टेजनंतर त्याचा ईकॉनॉमी रेट ५.१७ असा सर्वोत्तम राहिला आहे.
टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज-
३२- आर अश्विन
३० – अर्शदीप सिंग
३० – जसप्रीत बुमराह
२९ – हार्दिक पांड्या
२२ – रवींद्र जडेजा
विशेष म्हणजे टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम बांग्लादेशचा माजी कर्णधार शाकीब अल हसनच्या नावावर आहे. त्याने २००७ ते २०२४ दरम्यान ४३ सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेतल्या आहेत. या यादीच्या पहिल्या पाचमध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही.
टी२० विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
५० – शाकिब अल हसन
४४ – ऍडम झम्पा
४३- राशिद खान
४० – वानिंदू हसरंगा
३९ – शाहिद आफ्रिदी






