पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद 29 नोव्हेंबरला ऑनलाइन बैठक घेणार आहे. स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यास आधीच विलंब झाला आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देणं हे विलंबाचं कारण आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह हे 1 डिसेंबर रोजी आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. त्याच्या दोन दिवस आधी ही महत्त्वाची बैठक होत आहे.
भारत सरकारनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ते भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धेचं आयोजन करणं हा सर्वात व्यावहारिक पर्याय असल्याचं दिसतं. अशा स्थितीत भारताचे सामने पाकिस्तानबाहेर खेळले जातील.
सूत्रांनी सांगितलं की, जर पीसीबीनं हायब्रीड मॉडेलला संमती दिली, तर त्यांना 70 दशलक्ष डॉलर्स होस्टिंग फी व्यतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन दिलं जाईल. गेल्या वर्षी जेव्हा पाकिस्ताननं आशिया चषकाचं आयोजन केलं होतं, तेव्हा भारतानं आपले सामने श्रीलंकेत खेळले होते.
पीसीबीनं कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथील स्टेडियमचं नूतनीकरण करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी ही 1996 विश्वचषकानंतर पाकिस्ताननं आयोजित होणारी पहिली आयसीसी स्पर्धा असेल. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या हल्ल्यामुळे अनेक वर्ष पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प होतं. मात्र त्यांनी नुकतेच मायदेशात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघांविरुद्ध मालिका खेळल्या.
आयसीसीनं 2021 मध्ये पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्याची संधी दिली होती. त्यामुळे देशातच सर्व सामने आयोजित करण्यासाठी पीसीबीवर पाकिस्तानी चाहत्यांकडून सतत दबाव आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये न आल्यास पीसीबी भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी आपला राष्ट्रीय संघ पाठवणार नाही, अशी धमकीही पाकिस्तान बोर्डानं दिली आहे. पाकिस्ताननं गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा दौरा केला होता. सात वर्षांतील हा संघाचा पहिलाच भारत दौरा होता.
दुसरीकडे, इस्लामाबादमधील राजकीय विरोधामुळे श्रीलंकेचा ‘अ’ संघ पाकिस्तान ‘अ’ संघाविरुद्धची मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पुष्टी केली की, श्रीलंका क्रिकेटसोबत सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी मालिकेतील शेवटचे दोन सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याबाबतही धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा –
लिलावात अनसोल्ड राहिल्याचा बदला! अवघ्या 28 चेंडूत ठोकलं शतक, रिषभ पंतचा मोठा विक्रम उद्ध्वस्त
एका बाउन्सरने घेतला जीव, आजच्याच दिवशी घडली होती क्रिकेट इतिहासातील सर्वात दु:खद घटना!
मेगा लिलावात भारतानंतर कोणत्या देशाच्या खेळाडूंवर लागली सर्वाधिक बोली? या देशाचे खेळाडू रिकाम्या हातानं परतले