जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा परिणाम क्रिकेटवरही पाहायला मिळाला आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि मालिका कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. तरीही कोरोनाच्या सावटाखाली हळूहळू क्रिकेट क्षेत्र पुर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे. अनेक द्विपक्षीय मालिका आणि स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. परंतु प्रेक्षकांना अजूनही मैदानात येऊन सामना पाहण्याची परवानगी दिली जात नाहीये. अशातच आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रिकेटरसिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
येत्या १८ जून ने २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथॅम्प्टनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात प्रेक्षकांना मैदानात येऊन आपल्या संघाला समर्थन करण्याची संधी मिळणार आहे. प्रेक्षकांनी मैदानात येऊन चियर केल्यामुळे खेळाडूंच्या आत्मविश्वासात भर पडते. ज्याचा परिणाम त्यांच्या खेळावर दिसून येतो.
हॅम्पशायर काउंटी संघाचे प्रमुख रॉड ब्रान्सग्रोव्ह यांनी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आम्ही आता ४ दिवसांचा काऊन्टी सामना सुरू केला आहे, ज्यामध्ये सप्टेंबर २०१९ नंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळेल. हे पुढील सर्व काउन्टी सामन्यांमध्ये दिसून येईल. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गर्दी जमविणे हा देखील मोठा डाव असणार आहे.”
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४००० दर्शक लावणार हजेरी
इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या मते, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आयसीसी ४००० प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्याची अनुमती देऊ शकते. हॅम्पशायर काउंटीचे प्रमुख ब्रॅन्सग्रोव्ह यांनी सांगितले की, “प्रेक्षकांसाठी २००० तिकीटे उपलब्ध असतील; तर २००० तिकीटे आयसीसीचे प्रायोजक व भागिधारांसाठी असतील. अर्थात हा एक मोठा सामना आहे, म्हणूनच तयारी देखील मोठी असणे आवश्यक आहे.”
तसेच ब्रॅन्सग्रोव्ह पुढे म्हणाले की, “आम्ही साऊथॅम्प्टन या पोर्ट सिटीमध्ये येणाऱ्या भारतीय खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची वाट पाहत आहोत. त्यांचे विलागिकरण पूर्ण होण्याची देखील वाट पाहत आहोत. जेणेकरून ते लवकरच इथे पोहोचतील. आम्ही त्यांचा पाहुणचार करण्यास उत्सुक आहोत.”
येत्या २ दिवसात आयसीसी, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठीची नियमावली जाहीर करू शकते. कालपासून (१९ मे) भारतीय संघातील सर्व सदस्य मुंबईमध्ये एकत्र जमण्यास सुरुवात झाली आहे. तसेच २ जूनला ते इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एवढा मोठा फरक! संपूर्ण भारतीय महिला संघाचे वार्षिक मानधन आहे एकट्या कोहलीच्या पगारापेक्षाही कमी
काय प्रतिभा आहे! आंधळे असूनही ‘हे’ ४४ वर्षीय समालोचक त्यांच्या वाणीतून दर्शकांना करतात मंत्रमुग्ध
Video: कसोटी चॅम्पियनशीपची जंगी तयारी; कसोटीपटू चेतेश्वर पुजारा ‘अशी’ घेतोय मेहनत