पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पाकिस्तानने आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली, मात्र बाबरची सुरूवात निराशाजनक झाली. नेदरलॅंड्सविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी १२ चेंडूत २९ धावांची आवश्यकता होता. त्या सामन्यात फहीम अशरफने चौकर-षटकार नसते मारले नसते, तर पाकिस्तानने हा सामना गमावला असता.
या सामन्यात बाबरने १८ चेंडूत १५ धावा केल्या. यामुळे त्याच्यावर सर्व बाजूंनी टिका केली जात आहे. यातच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने ‘बाबरला पुढच्या सामन्यात घेणार नाही. तो काही सुपरस्टार नाही’, असे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तान हा सामना हारता-हारता वाचला , नाहीतर त्यांचा या स्पर्धेतील पुढील प्रवास खडतर झाला असता. यामध्ये बाबरच्या कामगिरीवरून कामरान अकमल आणि बासित अली हे एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. तेव्हा अली म्हणाले, “मला वाटते बाबर पुढील सामन्यात नाही दिसणार. कोच माईक हेसेनच्या चेहऱ्यावर जो राग दिसला, त्यावरून मला नाही वाटत ते त्याला पुढील सामन्यात पुन्हा चार क्रमांकावर खेळवतील ते.”
“बाबर वनडे आणि कसोटीचा सुपरस्टार आहे, मात्र तो टी२० प्रकारात बसत नाही. तो आपला नेहमीचा तिसरा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो आणि तेथेही तो चांगली कामगिरी करत नसेल तर मग काय म्हणावे. त्याच्यापेक्षा अधिक चांगले खेळाडू संघात आहेत. साहिबजादा फरहान, फहीम अरशफ यांनी हे बाबरच्या तुलनेत टी२०साठी उत्तम खेळाडू आहेत. तसेच सलमान अली आगाने क्रमांक तीनवर तो फलंदाजीसाठी योग्य पर्याय आहे, हे दाखवून दिले आहे,” असेही अलींनी म्हटले आहे.
कामराननेही न राहवत पुढे म्हटले, “चौथ्या क्रमांकावर बाबर स्वत:ला जबरदस्तीने फिट करण्याचा प्रयत्न करत आहे. नेदरलॅंड्स सारख्या संघाविरुद्ध आपली कामगिरी अशी का झाली?”
नेदरलॅंड्सविरुद्ध पाकिस्तानने १४८ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती. तेव्हा पाकिस्तानने ७ विकेट्स गमावत तीन चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. त्यांचा हा कसाबसा विजय त्यांच्या माजी क्रिकेटपटूंना पाहावला गेला नाही, असे कामरान आणि अली यांच्या वक्तव्यांवरून दिसून येते. या स्पर्धेत पाकिस्तानचा पुढील सामना १० फेब्रुवारीला युएसए विरुद्ध आहे. विशेष म्हणजे याच संघाने पाकिस्तानला मागील विश्वचषकात पराभूत केले आहे.






