न्यूझीलंडमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी, ICC) महिला वनडे विश्वचषक २०२२ चा थरार सुरू आहे. ४ मार्चपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र भारतीय संघ रविवार अर्थात ६ मार्चपासून त्यांच्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करेल. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघाविरुद्ध (IND vs PAK) होणार आहे. बे ओव्हल स्टेडियम, माउंट मौनगानुई येथे सकाळी ६.३० वाजता हा सामना रंगणार आहे.
या सामन्यापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामने खेळत चांगला सराव करून घेतला आहे. भलेही भारतीय संघाने ही मालिका १-४ च्या फरकाने गमावली असली तरीही; भारतीय संघाची फलंदाजी सकारात्मक बाब राहिली. मात्र भारतीय संघ गोलंदाजीत अपेक्षेनुसार (Indian Women Poor Bowling Performance) प्रदर्शन करू शकलेला नाही. त्यामुळे विश्वचषकात (Women ODI World Cup 2022) त्यांनी ही उणीव भरून काढणे आवश्यक आहे.
भारतीय संघाला गोलंदाजी प्रदर्शनात सुधारणेची आवश्यकता
वनडे विश्वचषकापूर्वीचे २ वार्म अप सामने आणि मागील न्यूझीलंडविरुद्धची ५ सामन्यांची वनडे मालिका, यातील भारतीय संघाचे प्रदर्शन पाहिले तर, फलंदाजी ही संघासाठी जमेची बाजू राहिलेली आहे. भारतीय संघाने या ७ पैकी ५ सामन्यांमध्ये २५० पेक्षा जास्त धावा फलकावर लावल्या आहेत. परंतु खराब गोलंदाजी प्रदर्शनामुळे भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय गोलंदाज न्यूझीलंडविरुद्धच्या ५ पैकी २ सामन्यात २७० पेक्षा जास्त धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अशा प्रदर्शनामुळे भारतीय संघाची विश्वचषकातील सामने गमावण्याची शक्यता वाढू शकते.
हेही वाचा- भारत आणि पाकिस्तान महिला संघ विश्वचषक सामन्यासाठी येणार आमने सामने, जाणून घ्या मॅचबद्दल सर्वकाही
विश्वचषक सामन्यांमध्ये अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी वेगवान गोलंदाजी विभागाचे नेतृत्त्व करेल. तिने मागील काही सामन्यांमध्येही चांगले प्रदर्शन करत आपल्या प्रदर्शनातील सातत्यता दाखवून दिली आहे. परंतु मेघना सिंग, पूजा वस्त्राकार आणि रेणुका सिंग या वेगवान गोलंदाजांना लय सुधारणेची गरज आहे.
दुसरीकडे फिरकीपटू दिप्ती शर्मा ही न्यूझीलंडविरुद्धच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज राहिली होती. तर राजेश्वरी गायकवाडने विश्वचषकातील वार्म अप सामन्यांमध्ये विकेट्स घेत तिच्या प्रदर्शनातील सातत्य दाखवून दिले आहे. त्यामुळे या दोन्ही फिरकी गोलंदाजांकडून विश्वचषकात चांगल्या गोलंदाजी प्रदर्शनाची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत आणि पाकिस्तान महिला संघ विश्वचषक सामन्यासाठी येणार आमने सामने, जाणून घ्या मॅचबद्दल सर्वकाही
‘जोपर्यंत मी चांगली फलंदाजी करतोय, तोपर्यंत चिंता नाही’, १०० वा कसोटी खेळणाऱ्या विराटची प्रतिक्रिया