भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारपासून दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. ॲडलेड येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मात्र खालच्या फळीत नितीश रेड्डी यानं संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली. त्यानं 42 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार मारले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं 6 विकेट घेतल्या.
टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कनं त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताची दुसरी विकेट केएल राहुलच्या रूपानं पडली. तो 64 चेंडूंचा सामना केल्यानंतर 37 धावा करून बाद झाला. राहुलनं या खेळीत 6 चौकार मारले. विराट कोहलीच्या रुपात भारताची तिसरी विकेट गेली. तो अवघ्या 7 धावा करून परतला.
शुबमन गिल एका टोकाकडून चांगली फलंदाजी करत होता. मात्र तो देखील फार काळ टिकू शकला नाही. गिल 51 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्यानं 5 चौकार मारले. रिषभ पंतनं 35 चेंडूंचा सामना करत 21 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 3 धावा करून बाद झाला. अश्विननं 3 चौकारांच्या मदतीनं 22 धावा केल्या. हर्षित राणाला खातंही उघडता आलं नाही.
अखेरच्या षटकांमध्ये नितीश रेड्डीनं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. त्यानं 54 चेंडूंचा सामना करत 42 धावा केल्या. रेड्डीच्या या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मोहम्मद सिराजनं एका चौकाराच्या सहाय्यानं नाबाद 4 धावा केल्या. बुमराह खातं न उघडता तंबूत परतला.
हेही वाचा –
केएल राहुल आऊट न होताच माघारी परतत होता, अंपायरनं अशाप्रकारे दिला दुसरा चान्स
ॲडलेड कसोटीत वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आर अश्विनला संधी का मिळाली? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
स्टार्कशी पंगा नको रे बाबा! पर्थ कसोटीत स्लेज करणारा जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद






