चेन्नई येथे भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारी (19 सप्टेंबर) सुरुवात झाली. पहिल्या सत्रात भारतीय संघ अडचणीत सापडल्यानंतर आधी यशस्वी जयस्वाल व रिषभ पंत यांनी डाव सावरला. त्यानंतर रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांनी 195 धावांची नाबाद भागीदारी करताना भारतीय संघाला 6 बाद 339 दिवसाखेर पुढे नेले. नाबाद शतक झळकावणारा रविचंद्रन अश्विन हा नायक ठरला. पहिल्या दिवसाच्या खेळीनंतर बोलताना त्याने अतिशय महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघ एकवेळ सहा बाद 144 अशा वाईट परिस्थितीत अडकला होता. त्या परिस्थितीतून जडेजा व अश्विन यांनी संघाला सावरले. अश्विन याने आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना दहा चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा केल्या. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक होते. आपल्या या शतकानंतर बोलताना त्याने आपण या खेळीचा आनंद घेतल्याचे म्हटले.
तो म्हणाला, “मला माझ्या घरच्या मैदानावर खेळायला आवडते आणि मी या खेळीचा पुरेपूर आनंद घेतला. मी टीएनपीएल (तामिळनाडू प्रीमियर लीग) दरम्यान माझ्या फलंदाजीवर काम केले. मला आता त्याचे फळ मिळाले आहे. ही जुनी चेन्नईची खेळपट्टी आहे, ज्यामध्ये उसळी देखील आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे फटके खेळू शकता.”
शतकवीर अश्विन पुढे म्हणाला, “जडेजाने या भागीदारीत खूप मदत केली, जेव्हा मी थकलो होतो तेव्हा त्याने त्याची काळजी घेतली आणि स्वत: जबाबदारी घेतली. आम्हाला दोन ते तीनमध्ये बदलण्याची गरज नाही. गेल्या काही वर्षांपासून तो संघाचा सर्वोत्तम फलंदाज आहे.”
पहिल्या दिवसाच्या खेळाबद्दल सांगायचे झाल्यास, भारतीय संघाने नाणेफेक गमावल्याने संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. या संधीचा फायदा घेण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. कर्णधार रोहित शर्मा हा केवळ सहा धावा काढून बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल खाते खोलू शकला नाही. विराट कोहली व केएल राहुल यांनी देखील अनुक्रमे 6 व 19 धावा बनवल्या. संघ अडचणीत असताना युवा यशस्वी जयस्वाल याने 53 व रिषभ पंत याने 39 धावांचे योगदान दिले. बांगलादेशसाठी हसन महमूद याने चार बळी मिळवले.
हेही वाचा –
बीसीसीआय उपाध्यक्षांना मातृशोक, राजीव शुक्ला यांच्या आईचे 97व्या वर्षी निधन
अश्विनची शतकी खेळी, जडेजासोबत भागीदारी करत रचला इतिहास; बांगलादेश पहिल्याच दिवशी बॅकफूटवर!
श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी सुरूच, पुन्हा एकदा शून्यावर बाद