कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने जबरदस्त शतक झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडने दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने जवळपास 5 षटके राखून आणि 4 विकेट्सने सामना जिंकला.
विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, “संघासाठी धावा काढणे खूप चांगले वाटले. विशेषतः जेव्हा मालिका निर्णायक टप्प्यावर असते, तेव्हा अशा खेळीमुळे आत्मविश्वास वाढतो.” त्याने नमूद केले की एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीची शैली वेगळी असते, कारण हा फॉरमॅट टी20 पेक्षा मोठा आणि कसोटीपेक्षा लहान असल्यामुळे खेळपट्टी व परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक असते.
रोहितने आपल्या रणनीतीबाबत सांगितले की, “माझ्याविरुद्ध इंग्लंडने शरीरावर गोलंदाजी करण्याचा आणि मला जागा न देण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती.” त्याने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या योगदानाबद्दलही कौतुक केले आणि त्यांच्यासोबत फलंदाजी करण्याचा आनंद व्यक्त केला.
भारताने या सामन्यात 305 धावांचे लक्ष्य 44.3 षटकांत 4 गडी राखून पूर्ण केले. रोहित शर्माने 90 चेंडूत 119 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. या शानदार खेळीसाठी रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्मा शिवाय उपकर्णधार शुबमन गिल (60 धावा) श्रेयस अय्यर (44 धावा) आणि अक्षर पटेल (41धावा) यांनी निर्णायक खेळी खेळली. ज्यामुळे भारताचा विजय सोपा झाला.
भारतीय संघ आता 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला व्हाईटवॉश करण्याच्या निर्धाराने उतरेल.
हेही वाचा-
IND vs ENG: रोहितचा पराक्रम! तेंडुलकर-द्रविडच्या विक्रमांना मागे टाकत रचला इतिहास
IND vs ENG: रोहितचा स्फोटक खेळ, भारताचा मालिका विजय, 416 दिवसांची प्रतीक्षा संपली!
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय, पाहा प्रकरण