भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (३१ जानेवारी) खेळला गेला. तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेलेला हा सामना सुरू होण्याआधीच चर्चेत आला होता. भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनचा घरच्या मैदानावरील त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी चाहते आतुर होते. या सामन्यात संजू संघात असतानाही विकेटकीपिंग इशान किशनने का केली याचा खुलासा भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने केला आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील काही सामन्यांमध्ये संघ व्यवस्थापकांनी संजू असून सुद्धा किशनला अंतिम अकरामध्ये संधी दिली. ही मालिका सुरू होण्याआधीच टी२० विश्वचशक समोर असताना काही निर्णय घेतले गेले. त्यातील एक विकेटकीपरबाबत. या मालिकेत दोघांनाही विकेटकीपर म्हणून काम करावे लागेल, हे सांगितले होते.
पाचव्या सामन्यानंतर सूर्यकुमारने पत्रकार परिषदेत याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले, “तिलकच्या अनुपस्थितीत दोन्ही विकेटकीपर संघात सहभागी झाले. मालिका सुरू होण्याआधीच आम्ही संजू तीन आणि इशान दोन सामन्यात विकेटकीपरची भुमिका पार पाडतील हे ठरवले होते.”
या मालिकेतील चौथ्या सामन्यात इशान दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्याबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “मागचा सामना इशान दुखापतीमुळे खेळला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला विकेटकिपींग करणे भाग होते. विश्वचषकाआधी संघात असे निर्णय घ्यावे लागतात.”
या सामन्यात इशानने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याच्या १०३ धावांच्या खेळीमुळे भारताने २० षटकात ५ विकेट्स गमावत २७१ धावसंख्या उभारली होती. हा सामना भारताने ४६ धावांनी जिंकला.
या मालिकेत संजू साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याने ५ सामन्यात खेळताना केवळ ४६ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या टी२० विश्वचषक २०२६च्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे इशानने ४ सामन्यात खेळताना २१५ धावा केल्या आहेत.
दोघांची कामगिरी पाहता आणि शेवटच्या सामन्यात इशानला विकेटकीपींगची संधी दिल्याने संजूची जागा धोक्यात आली की काय असा संभ्रम निर्माण झाला होता. तो आता सूर्यकुमारने दूर केला आहे.






