भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना सध्या मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याची सुरुवात शुक्रवारी (३ डिसेंबर) झाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचा पहिला डाव आटोपला आणि भारतीय संघाने त्यांच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी भारताने ७ बाद २७६ धावांवर डाव घोषित केला. दरम्यान, दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांच्या प्रदर्शनात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला.
भारतीय संघाचे पहिल्या पाच क्रमांकाच्या फलंदाजांमध्ये हा योगायोग पाहायला मिळाला. यामध्ये सलामीवीर मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारासह शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंचा समावेश आहे. भारताच्या फलंदाजी क्रमातील या पहिल्या पाच खेळाडूंनी या सामन्यात एका डावा प्रत्येकी किमान एक षटकार मारला आहे. यामध्ये मयंक, पुजारा, गिल आणि कोहली यांनी प्रत्येकी एक, तर पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या अय्यरने २ षटकार ठोकले. दरम्यान ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारतीय संघासाठी पहिल्या पाच क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूंनी कसोटी सामन्याच्या एका डावात प्रत्येकी किमान एक षटकार मारला आहे.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारतासाठी सलामीवीर मयंक अगरवालने (६२) पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने यावेळी अर्धशतकी खेळी केली. तत्पूर्वी, मयंक पहिल्या डावात १५० धावा करून संघाची धावसंख्य ३२५ पर्यंत घेऊन गेला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात पुजारा आणि गिल यांनी प्रत्येकी ४७ धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार विराट कोहलीने ३६ धावा केल्या. तर अय्यर (१४) आणि रिद्धिमान साहा (१३) मोठी खेळी करू शकले नाहीत. अक्षर पटेलने नाबाद (४१) धावांचे योगदान दिले.
न्यूझीलंडसाठी एजाज पटेलने पहिल्या डावात १० विकेट्स घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली होती. एजाजने त्याचा फिरकीची जादू दुसऱ्या डावात देखील दाखवली. त्याने दुसऱ्या डावात भाराताच्या महत्वाच्या चार विकेट्स घेतल्या. तर नवख्या रचिन रवींद्रने तीन विकेट्स मिळवल्या.