टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे ग्रुप स्टेजमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार होता. मात्र वर्ल्ड कप सुरू होण्याच्या अवघ्या पाच दिवस आधी पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतल्याने आयसीसी, ब्रॉडकास्टर आणि इतर सर्व हितधारकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
भारत-पाकिस्तान सामना हा आयसीसी स्पर्धांमधील सर्वात जास्त कमाई करून देणारा सामना मानला जातो. एका सामन्यातून सुमारे 250 मिलियन डॉलर म्हणजेच 2200 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळतो. काही अहवालांनुसार हा आकडा 3000 कोटी रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास आयसीसीला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) वार्षिक कमाई साधारण 35 ते 45 मिलियन डॉलर म्हणजेच 300 ते 400 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. या कमाईत आयसीसीकडून मिळणारा रेव्हेन्यू शेअर, पाकिस्तान सुपर लीग (PSL), द्विपक्षीय मालिका, तिकीट विक्री आणि प्रायोजकांचा समावेश आहे. PCB च्या एकूण उत्पन्नापैकी 80 टक्क्यांहून अधिक हिस्सा हा ICC कडून मिळणाऱ्या रेव्हेन्यूवर अवलंबून आहे. याच्या तुलनेत भारत-पाकिस्तानचा एकच सामना PCB च्या तब्बल सात वर्षांच्या कमाईइतका महसूल निर्माण करतो, हे विशेष उल्लेखनीय आहे.
भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास होस्ट ब्रॉडकास्टरला फक्त जाहिरातींच्या माध्यमातूनच 200 ते 250 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. या सामन्यात 10 सेकंदांचा जाहिरात स्लॉट सुमारे 40 लाख रुपयांना विकला जातो. त्यामुळे सामना रद्द होणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक नुकसान ठरणार आहे.
जर सामना झाला नाही, तर भारताला वॉकओव्हर मिळून थेट दोन गुण मिळतील. दुसरीकडे पाकिस्तानला नेट रनरेटचे नुकसान सहन करावे लागेल, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या स्पर्धेतील पुढील वाटचालीवर होऊ शकतो.
आयसीसी, बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात 2027 पर्यंत भारत-पाकिस्तान सामने न्यूट्रल वेन्यूवर खेळवण्याबाबत हायब्रिड मॉडेलवर सहमती झाली आहे. अशा परिस्थितीत केवळ भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा पाकिस्तानचा निर्णय कराराचे उल्लंघन ठरू शकतो. यामुळे पीसीबीसाठी हा निर्णय योग्य ठरवणे अवघड जाणार आहे.
या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आयसीसीने तातडीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य कारवाईत PSL वर निर्बंध, ICC रेव्हेन्यूमध्ये कपात, ब्रॉडकास्टरला नुकसानभरपाई देण्याचा आदेश, आशिया कपमधून वगळणे किंवा द्विपक्षीय मालिका स्थगित करणे यांचा समावेश असू शकतो.
एकूणच, पाकिस्तानच्या या निर्णयामुळे क्रिकेटच्या मैदानाबाहेर मोठा आर्थिक आणि राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.






