जम्मू काश्मीरचा उमरान मलिक आयपीएल २०२१मध्ये सर्वप्रथम चर्चेत आला होता. त्यावेळी सनरायझर्स हैदराबादने त्याला खेळण्याची संधी दिली होती. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२२मध्ये त्याने पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली आणि भारतीय संघात स्थान बनवले. याच पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज उमरानचे कौतुक करत आहेत. आता भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने देखील उमरानचे कौतुक केले आहे.
आयपीएल २०२२मध्ये उमरान मलिक (Umran Malik) सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर होता. त्याने १४ सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या. त्याचे प्रदर्शन आणि चेंडूचा वेग पाहून भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडले आहे. आयपीएलमध्ये उमरानने जरी चांगले प्रदर्शन केले असले, तरी काही सामन्यांमध्ये तो संघासाठी महागात नक्कीच पडला. याविषयी देखील आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने मत मांडले आहे.
स्वतःच्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “यादीत सर्वात आधी उमरान मलिक आहे. त्याचे नाव तसेही येणारंच आहे. तो जम्मू तवी एक्सप्रेस आहे. तो उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या चेंडूला गती आहे. त्याने स्वतःच्या गोलंदाजीने लोकांना घाबरवून आणि धमकावून पळवून लावले आहे.”
“त्याची दोन सामन्यांमध्ये धुलाई झाली. जेव्हा त्याच्या गोलंदाजीवर धावा निघतात, तेव्हा तो खूप महागात पडतो आणि मग संयम सुटतो. चार षटकांमध्ये ४० धावा! अनेकदा केन विलियम्सनने त्याला स्वतःचा कोटाही पूर्ण करू दिला नाही, पण जेव्हा कधी त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने तीन-चार विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही, तर पाच विकेट्स देखील घेतल्या आहेत.”
“यात शंका नाही की, प्रत्येकजण त्याच्या गतीविषयी बोलत आहे. कारण, त्याच्याकडे ती आहे. मात्र, मला त्याची जी गोष्ट आवडली, ती म्हणजे जेव्हा त्याने सुरुवात केली होती, तेव्हा तो चेंडू चारही बाजूला टाकत होता. चेंडू प्रत्येक दिशेला जात होता, पण हंगामात पुढे त्याने सुधारणा केली.” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
उमरान काही सामन्यामध्ये हैदराबाद संघासाठी महागात पडला, पण चोप्राच्या मते यावेळी उमरानची चूक नव्हती. तो म्हणाला की, “त्याने नंतर देखील धावा खर्च केल्या, पण असे यामुळे झाले नाही की, तो वाईड चेंडू टाकत होता. अनेकदा फलंदाज चांगले खेळतात. गतीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतात, जे होत असते, पण हा मुलगा खूप पुढे जाईल.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. उमरानला या मालिकेसाठी भारताच्या १८ सदस्यीय संघात निवडले गेले आहे, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेलंच याची अद्याप खात्री देता येणार नाही. जर त्याला संधी मिळाली, तर तो उमरानचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोणी संधी देता का संधी! ‘या’ ५ खेळाडूंना आयपीएल २०२२मध्ये बसावे लागले बाकावरच
एवढं कौतुक झालेल्या राजवर्धनला चेन्नईने बसूनच ठेवलं, का नाही मिळाली संधी?
‘डॉन ब्रॅडमनच्या मुलानेही नाव बदलले होते, तूही…’ कपिल देव यांचा अर्जुन तेंडुलकरला सल्ला