भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने वनडे क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात दणक्यात केली होती. सूर्याने भारतासाठी पहिल्या सहा वनडे सामन्यात 2 अर्धशतके आणि 4 वेळा 30हून अधिक धावा केल्या. मात्र, पुढील 19 सामन्यात त्याची बॅट तळपायचं नावच घेत नाहीये. कारण, तो नंतर फक्त 215 धावा करू शकला आहे. त्याने या काळात एकही अर्धशतक केले नाही. तसेच, त्याची एकूण धावसंख्या ही फक्त 30हून अधिक राहिली आहे. अशात त्याच्या फॉर्म आणि वनडे संघातील जागेविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
टी20 स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे चाहते असेही म्हणत आहेत की, सूर्या या क्रिकेट प्रकारासाठी बनलाच नाहीये. अशात या प्रतिभावान खेळाडूला भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे.
‘सूर्यकुमार वनडे क्रिकेट शिकत आहे’
वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेत भारताचा 6 विकेट्सने दारुण पराभव झाला. या सामन्यात सूर्यकुमार फक्त 25 चेंडूत फक्त 24 धावा करून बाद झाला. त्यात 3 चौकारांचा समावेश होता. सामन्यानंतर राहुल द्रविड म्हणाला की, “मला वाटते की, सूर्या वास्तवात एक चांगला खेळाडू आहे. याबाबत कोणतीही शंका नाहीये. त्याच्या प्रदर्शनाने हे दाखवले आहे, खासकरून टी20 क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही. दुर्दैवाने, मला वाटते की, असे बोलणारा तो पहिलाच व्यक्ती असेल की, त्याची वनडेतील आकडेवारी कदाचित उच्च मानकांनुसार नाहीये, जी त्याने टी20 क्रिकेटमध्ये निर्माण केली आहे. मात्र, तो वनडे क्रिकेटबाबत शिकत आहे.”
‘आम्ही त्याला जास्तीत जास्त संंधी देऊ इच्छितो’
भारतीय मुख्य प्रशिक्षकाने म्हटले की, “मला वाटते की, तो आपल्या खेळाविषयी अजून शिकत आहे. तो हे शिकत आहे की, मधल्या षटकांमध्ये कशाप्रकारे फलंदाजी करायची आहे. तो एक प्रतिभावान आहे आणि आम्हाला त्याला जास्तीत जास्त संधी द्यायच्या आहेत. आता संधीचा वापर करण्याचे वास्तवात त्याच्यावर अवलंबून आहे. मात्र, आम्ही ज्याप्रकारच्या व्यवस्थेत आहोत, आम्हाला खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्यायला आवडते.”
अंतिम सामन्यावर सर्वांच्या नजरा
वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाचे 182 धावांचे आव्हान 36.4 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले. यासह त्यांनी मालिकेत 1-1 अशी आघाडी घेतली. आता मालिका कोण जिंकणार हे, मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) त्रिनिदाद येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात समजेल. खरं तर, दोन्ही सामन्यात संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिली होती. तसेच, प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्या याच्याकडे नेतृत्वाची धुरा होती. मात्र, संघाला पराभव पत्करावा लागला. हा भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध 9 सामन्यांनंतर पहिला पराभव होता. (ind vs wi coach rahul dravid defends suryakumar yadav poor form in odi after loss )
महत्त्वाच्या बातम्या-
‘Ashes’ इतिहासातील सर्वात मोठा विक्रम Ben Stokesच्या नावावर, 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड केला उद्ध्वस्त
तब्बल 25 हजार धावा करणाऱ्या विराटवर आली ‘वॉटर बॉय’ बनण्याची वेळ, तरीही जिंकली कोट्यवधी मने- Video






