मेलबर्न। आज(८ मार्च) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर गतविजेत्या ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. या विश्वचषकातील एकही सामना पराभूत झाला नाही. त्यामुळे ही विजयाची मालिका आजही कामय ठेवून पहिले विश्वविजेतेपद मिळण्याचा भारतीय महिला संघाचा इरादा असेल.
विशेष म्हणजे या विश्वचषकाचा पहिला सामनाही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातच झाला होता. या सामन्यापासून भारतीय संघाचा सुरु झालेला विजयी प्रवासाचा घेतलेला हा आढावा –
साखळी फेरी – अ गट –
पहिला सामना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
गतविजेता म्हणून या विश्वचषकासाठी खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात पराभवाचा जोरदार धक्का दिला. या सामन्यात भारताची फिरकीपटू पूनम यादव चमकली. तिने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. तर ३ विकेट्स घेत शिखा पांडेने तिला चांगली साथ दिली. त्यामुळे भारताने विजयासाठी दिलेले १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ ११५ धावांवर सर्वबाद झाला.
दुसरा सामना – भारत विरुद्ध बांगलादेश
पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाचा दुसरा सामना बांगलादेश महिला संघाविरुद्ध झाला. भारताने हा सामना १८ धावांनी जिंकला. या सामन्यातही पुनम यादवची गोलंदाजी बहरली. तिने या सामन्यातही ३ विकेट्स घेतल्या. तर शिखा पांडे आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारताने दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ ८ बाद १२४ धावाच करता आल्या.
तिसरा सामना – भारत विरुद्ध न्यूझीलंड
पहिले दोन्ही सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा तिसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध झाला. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने ३ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. या सामन्यात शेफालीने केलेली तडाखेबंद खेळी महत्त्वाची ठरली. तिने ३४ चेंडूत ४६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला शेवटच्या षटकात केवळ १६ धावांची आवश्यकता होती. पण न्यूझीलंडला १२ धावाच करता आल्या. हे षटक भारताकडून शिखा पांडेने टाकले होते.
चौथा सामना – भारत विरुद्ध श्रीलंका
श्रीलंका महिला संघाविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने ७ विकेट्सने विजय मिळवत अ गटातील अव्वल स्थान पक्के केले होते. या सामन्यात भारताने राधा यादवच्या शानदार गोलंदाजी प्रदर्शनामुळे श्रीलंकेला २० षटकात ११३ धावांवर रोखण्यात यश मिळवले होते. राधाने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच नंतर शेफाली वर्माने केलेल्या ४७ धावांच्या जोरावर भारताने ११४ धावांचे आव्हान १५ व्या षटकात पूर्ण केले.
उपांत्य सामना – भारत विरुद्ध इंग्लंड
हा सामना पावसामुळे नाणेफेकही न होता रद्द झाला. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारताची अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.