---Advertisement---

‘संघ सहकाऱ्यांनी धीर दिला’, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत सिराज झाला भावुक

On: सोमवार, नोव्हेंबर 23, 2020 10:11 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडिलांचे शुक्रवारी (२० नोव्हेंबर) निधन झाले. ते काही काळापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. मात्र, सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये असलेला सिराज वडिलांच्या निधनानंतरही भारतात परतला नाही. आपल्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अजूनही भारतीय संघासोबत आहे. या कठीण प्रसंगात भारतीय संघातील सर्व सदस्य आपल्या सोबत आहेत, असे सांगतानाचा सिराजचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सिराज भावनिक झालेला दिसला. यामध्ये सिराज आपल्या वडिलांबद्दल बोलताना म्हणाला, “वडिलांचा हात आता माझ्या डोक्यावर नाही. परंतु आता मी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळेल. वडिलांचे निघून जाणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे नुकसान आहे.”

संघ सहकाऱ्यांनी दिला धीर, विराटचे शब्द होते सकारात्मक

या दुःखद क्षणी संघ सहकाऱ्यांनी आपल्याला धीर दिल्याचे सिराजने सांगितले. भारतीय संघाबद्दल बोलताना तो म्हणाला, “आमचा संघ एका कुटुंबासारखा आहे. सर्वांनी मला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही. तणाव घेऊ नको. मनाने मजबूत रहा. हे तुझ्या वडिलांचेही स्वप्न होते आणि आता तू ते पूर्ण कर. जर या परिस्थितीत तू खंबीर राहिलास, तर ते तुझ्यासाठी खूप चांगले असेल. विराटचे हे शब्द खूप सकारात्मक होते.”

वडिलांचे स्वप्न पूर्ण कर, आईने दिला सल्ला

सिराजने आपल्या आईशी झालेला संवाद सांगताना म्हटले, “अम्मीने मला सांगितले, प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जावे लागते. तू तिथेच रहा आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण कर.”

वडिलांनी मेहनतीने बनवले होते सिराजला क्रिकेटपटू

सिराजचे वडील रिक्षाचालक होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना त्यांनी, आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनविण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीची कमी त्यांनी पडू दिली नाही. सिराजची २०१७ आयपीएलमध्ये निवड होईपर्यंत ते रिक्षा चालवायचे.

सिराजची प्रथमच झाली आहे कसोटी संघात निवड

आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून चमकदार कामगिरी केल्यानंतर सिराजने जवळपास दोन वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याची प्रथमच कसोटी संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियात १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मालिकेचा भारत गतविजेता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन

मोहम्मद सिराजच्या घातक चेंडूवर पृथ्वी शॉ क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---