भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट राखून पराभव केला. प्रथम खेळताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य १७.२ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील संभाव्य बदलांवर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्त बदल करण्यास नकार दिला आहे. भारतीय संघाने मालिका जिंकली आहे आणि अशा परिस्थितीत आता अशा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते ज्यांना अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. ऋतुराज गायकवाड, युजवेंद्र चहल आणि आवेश खान या खेळाडूंना अद्याप संधी मिळालेली नाही. मात्र, कर्णधार रोहित शर्माला संघात फारसे बदल करायचे नसून, खेळत असलेल्या खेळाडूंना अधिक संधी द्यायची आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर तो म्हणाला, “हा युवा संघ आहे आणि खेळाडूंनी अजून फारसे सामने खेळलेले नाहीत. खेळाडूंना मैदानात वेळ घालवण्याची पूर्ण संधी मिळणे खूप महत्त्वाचे आहे. पुढील सामन्यात बदलांचा विचार करणे, हे खूप घाईचे ठरेल. आम्हाला संघाच्या हितासाठी जे काही करावे लागेल ते करू. आता जे खेळाडू खेळत आहेत त्यांची काळजी आम्हाला घ्यावी लागेल. कारण ते अजून जास्त खेळलेले नाहीत. त्याचबरोबर ज्या खेळाडूंना अद्याप संधी मिळालेली नाही, त्यांची वेळ नक्कीच येईल. संघाला अजून बरेच टी-२० सामने खेळायचे आहेत.”
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघ : टीम साऊदी (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, ऍडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टीम सेफर्ट, ईश सोढी.