भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. बुधवारी (१७ ऑक्टोबर) भारताचा नवा टी२० कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १६४ धावा केल्या. भारतीय संघाने पाच गडी राखून सामना सहज जिंकला. या विजयासह भारताने एक मोठे यश आपल्या नावावर नोंदवले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० विजयानंतर भारतीय संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. जयपूर येथे तब्बल ८ वर्षांनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले गेले आणि टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघ, जयपूरच्या या स्टेडियमवर पहिला टी२० सामना जिंकणारा संघ बनला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर मार्टिन गप्टिलच्या (७०) शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ६ गडी गमावून १६४ धावा केल्या. गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी संघासाठी ७७ चेंडूत १०९ धावांची भागीदारी केली. चॅपमनने ५० चेंडूत ६३ धावा ठोकल्या आणि टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. भारताकडून आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन तर दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ५.१ षटकात ५० धावांची भागीदारी केली. राहुल १५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावा जोडून विजयाच्या आशा उंचावल्या. रोहित शर्माने ३६ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या.
रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने ४० चेंडूत ६२ धावांची खेळी खेळली, मात्र अखेरच्या षटकांमध्ये भारताने संथ गतीने फलंदाजी करत सामना २० व्या षटकापर्यंत खेचला. अखेर रिषभ पंतने विसाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. पंतने १७ चेंडूत १७ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने २ तर टीम साऊथी, मिचेल सँटनर आणि डॅरिल मिशेल यांनी १-१ विकेट घेतली. न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही संघांमध्ये १९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने सात जिंकले आहेत. न्यूझीलंड संघाने नऊ सामने जिंकले आहेत, तर दोन सामने टाय आणि एक रद्द झाला आहे.