भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना टाय झाला. त्यामुळे सामन्याचा निकाल लागला नाही. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं भारताविरुद्ध 8 गडी गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 230 धावांवर सर्वबाद झाला. सामना टाय झाला पण टी20 सामन्याप्रमाणे या सामन्यात एकही सुपर ओव्हर खेळली गेली नाही.
आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) जिंकल्यानंतर टी20 फॉरमॅटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्मानं (Rohit Sharma) एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले पण तो भारताला सामना जिंकून देऊ शकला नाही. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या कर्णधारानं फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि 8 गडी गमावत 230 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 230 या धावसंख्येवर ऑलआऊट झाला. त्यामुळे सामना अनिर्णितच राहिला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामनाही टाय झाला होता. या सामन्यात सुपर ओव्हर घेण्यात आली. त्यामध्ये भारतीय संघानं सहज विजय मिळवला. तर आता एकदिवसीय मालिकेतील पहिला सामनाही बरोबरीत सुटला होता पण आयसीसीच्या नियमांमुळे या सामन्यात सुपर ओव्हर घेण्यात आली नाही.
आयसीसीच्या नियमांनुसार, सर्व टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सुपर ओव्हरची तरतूद आहे. सामना टाय झाल्यास, सामना सुपर ओव्हरमध्ये जातो आणि सामन्याचा निकाल लागतो तर एकदिवसीय सामन्यांमध्ये आयसीसीचे नियम वेगळे आहेत. या फॉरमॅटसाठी सुपर ओव्हरची कोणतीही तरतूद नाही. फक्त आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत, सुपर ओव्हर खेळवली जाते आणि विजेता निश्चित केला जातो.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा एकदिवसीय सामना रविवारी (4 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. तर तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी (7 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. दोन्ही सामने कोलंबो मैदानावर खेळले जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार हे सामने 2:30 वाजता सुरु होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटचा थरार होणार डबल! भारतातील या शहरात बांधण्यात येणार आणखी एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम
फक्त 24 धावा करुन कोहलीनं रचला इतिहास! ‘या’ दिग्गज खेळाडूला टाकलं मागे
भारतानं दोनच वनडे विश्वचषक जिंकले, मग जर्सीवर तीन स्टार्स कसे?