विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज भारताने 203 धावांनी मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने महत्त्वाचा वाटा उचलला.
त्याने या सामन्यात पहिल्या डावात 244 चेंडूत 176 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 23 चौकार आणि 6 षटकार मारले. तसेच त्याने दुसऱ्या डावातही शतकी खेळी करताना 10 चौकार आणि 7 षटकारांसह 149 चेंडूत 127 धावा केल्या. त्याच्या या शानदार कामगिरीनंतर त्याला या सामन्यातील सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
त्यामुळे रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवणारा विरेंद्र सेहवागनंतरचा पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2008 ला मार्चमध्ये चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवला होता. या सामन्यात सेहवागने पहिल्या डावात 319 धावांची खेळी केली होती.
विशाखापट्टणम येथे आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवत 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.