भारतीय खेळाडू सध्या आयपीएल 2024 मध्ये व्यस्त आहेत. आयपीएल संपताच 2 जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे खेळली जाईल. 2 जून ते 29 जून दरम्यान स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे.
परंतु या विश्वचषकात भारतीय संघाच्या अडचणीत लक्षणीय वाढ होऊ शकते. याचं मुख्य कारण म्हणजे वर्कलोड मॅनेजमेंट. वास्तविक, आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. तर ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना 19 मे रोजी होणार आहे. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंना विश्वचषकापूर्वी विश्रांतीसाठी फारसा वेळ मिळणार नाही. अशा स्थितीत भारतीय संघाला दुखापती, खराब फॉर्म अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.
भारतीय संघासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे रिषभ पंतची फिटनेस. रिषभचा 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण कार अपघात झाला होता. या अपघाततून बरं झाल्यानंतर त्यानं थेट आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन केलं. आता जर त्याला पुरेशी विश्रांती मिळाली नाही तर कदाचित त्याला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. अशा स्थितीत सलग सामने खेळणे त्याच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.
दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म सध्या खूपच खराब आहे. रोहितनं गेल्या 5 सामन्यांमध्ये केवळ 33 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनू शकतो. आणखी एक बाब म्हणजे रोहित प्रत्येक वेळी झेलबाद झाला आहे. म्हणजेच या 5 सामन्यांमध्ये त्याची षटकार मारण्याची क्षमता संशयाच्या भोवऱ्यात आलेली पाहायला मिळते.
आयपीएल 2024च्या पहिल्या 7 सामन्यात रोहितची सरासरी 49.5 एवढी होती. या काळात त्यानं शानदार शतकही झळकावलं होतं. मात्र आता त्याला दीर्घ विश्रांतीची गरज असल्याचं दिसतं. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसह अनेक दिग्गजांनीही हे मत व्यक्त केलं आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याही सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याच्या बॅटमध्ये पूर्वीची धार दिसत नाही. गोलंदाजीत तो नक्कीच विकेट घेत असला तरी, त्याची फलंदाजीही संघासाठी खूप महत्त्वाची आहे. पांड्याबाबत विश्लेषकांचं मत आहे की, त्याला विश्रांतीची गरज आहे. तो देखील दीर्घ काळ दुखापतीमुळे बाहेर राहिल्यानंतर आयपीएलमध्ये परतला आहे.
मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवचा फॉर्म आणि फिटनेसही चिंतेचं कारण आहे. सूर्यानं 9 डावात 334 धावा केल्या आहेत. या काळात त्यानं 1 शतक आणि 3 अर्धशतकेही झळकावली. परंतु सूर्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव आहे. हा मोठा मुद्दा नसला तरी त्याची फिटनेस चिंतेची सबब बनू शकते. सूर्या स्पोर्ट्स हर्नियामुळे आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर पडला होता. अशा स्थितीत त्याला पुरेशी विश्रांती न मिळाल्यास ही दुखापत पुन्हा उफाळून येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट कोहलीला टी20 विश्वचषकात सलामीला खेळायला पाठवा”, सौरव गांगुलीचा टीम मॅनेजमेंटला सल्ला