टी २० विश्वचषक २०२१ साठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे या संघात बदल होण्याची शक्यता आहे. शनिवार, ९ ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन बदल मंजूर केले जाऊ शकतात.
कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक रवी शास्त्री, बोर्ड सचिव जय शाह आणि मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आयसीसीच्या नियमांनुसार भारतीय संघ १० ऑक्टोबरपर्यंत बदल करू शकतात.
बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. यामध्ये इशान किशनच्या जागी संघात श्रेयस अय्यरचा समावेश केला जाऊ शकतो. अय्यर सध्या राखीव खेळाडू म्हणून सहभागी आहे. इशान यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या तीन सामन्यांमध्ये फक्त ११, १४ आणि ९ धावा करू शकला. पण त्याने शेवटच्या दोन सामन्यात दमदार कामगिरी केली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध २५ चेंडूत नाबाद ५० धावांची आक्रमक खेळी केली. तसेच, हैदराबादविरुद्ध ३२ चेंडूच ८४ धावांची खेळी केली.
दुसरीकडे, जर आपण अय्यरबद्दल बोललो, तर त्याने ४७ *, ४३, १, ३३* आणि २ धावांची खेळी खेळली आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही.
लेगस्पिनर राहुल चाहरला यूएईमध्ये आतापर्यंत फारशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला ४ सामन्यात फक्त २ बळी मिळवता आले आहेत. शेवटच्या ३ सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग ११ मध्येही स्थान मिळाले नाही. दुसरीकडे, विश्वचषकासाठीच्या संघाबाहेर असलेला अनुभवी लेग स्पिनर युझवेंद्र चहलने संयुक्त अरब अमिरातीमध्ये ६ सामन्यांमध्ये ११ विकेट घेत निवडकर्त्यांवर दबाव वाढवला आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर आरसीबी संघ आयपीएल प्लेऑफमध्येही पोहोचला आहे.
अष्टपैलू हार्दिक पंड्याने आयपीएल २०२१ मध्ये गोलंदाजी केलेली नाही. फलंदाजीत त्याची कामगिरीही चांगली राहिलेली नाही. त्याने यूएईमध्ये खेळलेल्या दुसऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ५ डावांमध्ये ३, ४०*, १७, ५*, १० धावा केल्या आहेत. यानंतरही तो संघात कायम राहण्याची शक्यता आहे.
शार्दुल ठाकूरचा अष्टपैलू म्हणून संघात समावेश केल्याची चर्चाही रंगली आहे. सध्या त्याला राखीव म्हणून विश्वचषक संघात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये चमकदार गोलंदाजी करताना १३ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ईशान-सूर्यकुमारचा डबल धमाका! ४ वर्षांपूर्वीच्या सुनील नरेन-ख्रिस लिनच्या विक्रमाची केली बरोबरी
टी२० विश्वचषकात खेळाडू कोरोना संक्रमित आढळल्यास काय होणार? वाचा काय आहेत आयसीसीचे नियम
बुमराह ऑन फायर! आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा चौथाच भारतीय गोलंदाज