महिला आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला नाही, असं 20 वर्षांत एकदाही घडलं नाही. आता 2024 महिला आशिया चषक स्पर्धेतही भारतीय संघानं फायनलचं तिकीट निश्चित केलं आहे!
आशिया चषक 2024 चं आयोजन श्रीलंकेत होत आहे. 26 जुलै रोजी दाम्बुला येथे खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं बांग्लादेशचा 10 गडी राखून सहज पराभव करत फायनलमध्ये थाटात एंट्री केली. पहिला महिला आशिया चषक 2004 मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून ही 9वी आशिया कप स्पर्धा खेळली जात आहे. भारतीय संघानं सलग 9व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतानं आतापर्यंत एकूण सात जेतेपदं जिंकली आहेत. 2018 मध्ये भारताला जेतेपदाच्या लढतीत बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
2004, 2005, 2006 आणि 2008 महिला आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळले गेले होते. तर 2012, 2016, 2018, 2022 आणि 2024 आशिया चषक टी20 फॉरमॅटमध्ये खेळले गेले. महिला आशिया चषक 2024 मध्ये भारताची जेतेपदासाठी लढत कोणासोबत होणार याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना यजमान श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. या दोनपैकी जो संघ जिंकला, त्याची अंतिम सामन्यात भारताशी गाठ पडेल. 28 जुलै रोजी अंतिम सामना होणार आहे.
2022 महिला आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला होता. 2024 आशिया कपमध्ये भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, भारतानं उपांत्य फेरीचा सामना 10 गडी राखून जिंकला. बांग्लादेशनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत आठ गडी गमावून 80 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतानं 11 षटकांत 83 धावा करत सामना जिंकला. सामनावीर रेणुका ठाकूर सिंग हिनं 4 षटकात अवघ्या 10 धावा देत 3 बळी घेतले.
हेही वाचा –
आशिया चषक 2024 : सेमिफायनलमध्ये रेणुका सिंगचा कहर! भारताचा सलग नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश
पांड्या नव्या भूमिकेत, प्रशिक्षक गंभीरचा फॉर्म्युला टीम इंडियाला टी20 मालिका जिंकण्यास मदत करेल का?
शुबमन गिलचं प्रमोशन! वनडे-टी20 पाठोपाठ कसोटी संघातही मिळू शकते मोठी जबाबदारी