क्रिकेटविश्वातील आणि इतर क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी रविवार (दि. 23 ऑक्टोबर) हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, या दिवशी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील दोन कट्टर प्रतिस्पर्धी देशांमध्ये ‘महामुकाबला’ होणार आहे. ते दोन देश म्हणजेच भारत आणि पाकिस्तान होय. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने- सामने येणार आहेत. या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत. मात्र, आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यांचा इतिहास काय सांगतो? हे आपण जाणून घेऊया…
आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकातील भारताच्या पहिल्या सामन्याची आकडेवारी
टी20 विश्वचषक (T20 World Cup) या स्पर्धेचे 2007 चे पहिले वहिले विजेतेपद एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने आपल्या नावावर केले होते. या पहिल्या वहिल्या टी20 विश्वचषकातील भारताचा पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध डर्बन येथे झाला होता. मात्र, हा सामना रद्द केला गेला होता. त्यानंतर 2009मध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध नॉटिंघममध्ये पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश संघाला 25 धावांनी धूळ चारली होती. 2010मधील टी20 विश्वचषकातील भारताची सुरुवातही विजयानेच झाली होती. अफगाणिस्तानविरुद्ध ग्रॉस आयलेट येथे झालेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने सामना खिशात घातला होता.
पुढे 2012च्या टी20 विश्वचषकातही भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाला कोलंबो येथे 23 धावांनी विजय मिळवला होता. 2014च्या टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मीरपूर येथे 7 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला होता. यानंतर 2016च्या टी20 विश्वचषकातील सुरुवात भारतासाठी निराशाजनक ठरली. भारताला नागपूर येथे न्यूझीलंडकडून 47 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तसेच, मागील वर्षी म्हणजेच 2021च्या टी20 विश्वचषकात पुन्हा एकदा भारतीय संघाने 2016च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती केली. भारताला या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून दुबई येथे एक-दोन नाही, तर 10 विकेट्सने पराभव सहन करावा लागला.
आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान संघ 2022च्या टी20 विश्वचषकात आमने-सामने येणार आहेत. अशात हा पहिला सामना गमावत भारत पराभवाची हॅट्रिक करतो की, विजयी सुरुवात करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. असे असले, तरीही भारतीय संघाने पहिल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकल्यानंतर, त्यांना पुढील सहा विजेतेपदांवर पाणी सोडावे लागले. मात्र, आता हा 2007नंतरचा हा वनवास रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ 2022च्या टी20 विश्वचषकात संपवतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच
‘त्यांनी चांगली गोलंदाजी केली’, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक