जगभरात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर आहे. ही लोकप्रियता त्याच्या फलंदाजी, यष्टीरक्षणाच्या कौशल्याबरोबरच त्याच्या शांत स्वभावामुळे आणि त्याने वेळोवेळी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीमुळे आहे. आज त्याचा ४० वा वाढदिवस आहे.
खिलाडूवृत्ती ही अनेकदा क्रीडा स्पर्धांमध्ये महत्त्वाची मानली जाते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना अनेकदा अशी खिलाडूवृत्ती दाखवली आहे, ज्यामुळे त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अशाच घटनांचा घेतलेला आढावा –
१. गांगुलीला शेवटच्या कसोटी सामन्यात दिली नेतृत्वाची जबाबदारी –
नोव्हेंबर २००८ ला नागपूरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सौरव गांगुली कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळत होता. त्या सामन्यात एमएस धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. त्यावेळी धोनीने गांगुलीला त्या सामन्यात नेतृत्व करण्यासाठी विचारले होते.
गांगुलीने इतक्यावर्षे भारतीय क्रिकेटची केलेल्या सेवेचा आणि गांगुलीमधील एका कर्णधाराचा सन्मान करण्यासाठी त्याला धोनीने पुन्हा एकदा नेतृत्व करण्याबद्दल विचारले होते. धोनीच्या या निर्णयामुळे आश्चर्यचकित झालेल्या गांगुलीने सुरुवातीला नाही म्हटले होते.
पण भारत जिंकण्याच्या जवळ आला असताना धोनीने पुन्हा गांगुलीला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याबद्दल विचारले. अखेर गांगुलीने होकार दिला आणि काही षटके भारताचे पुन्हा एकदा नेतृत्व केले. धोनीने गांगुलीचा केलेल्या सन्मानामुळे त्याने अनेकांचे मन जिंकले होते.
२. इयान बेल धावबाद झाल्यानंतरही पुन्हा त्याला फलंदाजीसाठी बोलवण्यात आले –
साल २०११ ला भारत विरुद्ध इंग्लंड संघात ट्रेंट ब्रिजला झालेल्या कसोटी सामन्यात धोनीने धावबाद झालेल्या इयान बेलला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले होते.
झाले असे की इंग्लंडच्या दुसऱ्या डावात इयान बेल १३७ धावांवर होता. त्यावेळी ओएन मॉर्गनने ६६ व्या षटकाचा शेवटचा चेंडू डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केला. तिथे प्रविण कुमार क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी मॉर्गन आणि बेल चौकार गेला असे समजून टी ब्रेकसाठी ड्रेसिंग रुमकडे जाण्यास निघाले, पण तो चेंडू चौकार गेला नव्हता.
त्यावेळी अभिनव मुकुंदने चेंडू घेत स्टंपवरील बेल्स उडवल्या आणि बेल धावबाद झाल्याचे अपिल केले. पंचांनी रिप्ले तपासले त्यावेळी चेंडूने बाऊंड्री लाईन पार केली नसल्याचे दिसले आणि त्यामुळे बेल बाद झाला.
त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी धोनीला धावबादचे अपिल मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी धोनीने संघातील खेळाडूंशी चर्चा करुन बेलविरुद्धचे धावबादचे अपिल मागे घेत त्याला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले. त्यावेळी भारतीय संघासाठी सर्वांनी टाळ्या वाजवत त्यांचे पुन्हा मैदानात स्वागत केले. त्यावर्षी धोनीला आयसीसीचा खिलाडूवृत्तीचा पुरस्कारही मिळाला. तसेच दशकातील सर्वोत्तम खिलाडूवृत्तीचा पुरस्कारही धोनीला मिळाला.
३. विराट कोहलीला विजयी धाव काढण्याची दिली संधी –
साल २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या ५ व्या वनडे सामन्यात धोनीने विराट कोहलीला विजयी धाव काढण्याची संधी दिली होती. त्या सामन्यात भारतासमोर २३९ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने शतकी खेळी केली होती.
विराट १०९ धावांवर खेळत असताना धोनी फलंदाजीसाठी आला. त्यावेळी भारताला २३ चेंडूत केवळ २ धावांची गरज होती. तेव्हा धोनीने त्याच्या पहिल्या चेंडूवर केवळ १ धाव काढत स्ट्राईक विराटला दिली होती, जेणेकरुन विराट विजयी धाव काढेल.
अशीच घटना २०१४ च्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात झाली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी भारताला ७ चेंडूत १ धावेची गरज होती. तेव्हा धोनी स्ट्राईकवर होता. पण त्याने धाव काढली नाही. त्यामुळे शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू अर्धशतकी खेळी केलेल्या विराटला खेळायला मिळाला आणि त्यानेही विजयी चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
विराटने त्या सामन्यात नाबाद ७२ धावा केल्या होत्या. त्याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.
४. धोनी विजेतेपदाची ट्रॉफी सोपवतो युवा खेळाडूंकडे –
सांघिक खेळात नेहमीच संघतील सर्व खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असते. पण विजेतेपदाची ट्रॉफी नेहमी कर्णधार स्विकारत असतो. पण धोनीने नेहमी जेव्हाही ट्रॉफी स्विकारली तेव्हा त्याने ती युवा खेळाडूंकडे सोपवली आहे.
यामागील कारण सांगताना धोनी म्हणतो, कर्णधार असल्याने तूम्हाला त्या ट्रॉफीबरोबर सुरुवातीचे काही क्षण अनुभवण्याची संधी मिळालेली असते, त्यामुळे आता युवा खेळाडूंना आनंद घेऊ द्यायचा असतो.
साल २०१३ ला वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील साखळी फेरी दरम्यान धोनी दुखापतग्रस्त असल्याने विराटने भारताचे नेतृत्व केले होते. त्यावेळी धोनी नंतर अंतिम सामन्यात खेळला. अंतिम सामना भारताने जिंकल्याने ट्रॉफी धोनीकडे सोपवण्यात आली, पण त्याने साखळी फेरीत भारताचे नेतृत्व केलेल्या विराटसह ती ट्रॉफी स्विकारली.
५. दुखापतग्रस्त झालेल्या फाफ डू प्लेसिसच्या मदतीला धावून आला धोनी –
साल २०१५ ला दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी ऑक्टोबर महिना असल्याने भारतात उष्णता होती. त्यामुळे अनेकदा परदेशी खेळाडू या उष्णतेत खेळताना थकतात. पण असे असतानाही ५ व्या वनडे सामन्यात फाफ डू प्लेसिसने शतकी खेळी केली होती.
पण या दरम्यान शतकाकडे वाटचाल करत असताना षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्याच्या पायांमध्ये क्रॅम्प आला. त्यामुळे तो खाली पडला. यावेळी लगेचच भारताचा त्यावेळीचा कर्णधार धोनी त्याच्या मदतीला आला आणि त्याने त्याच्या पायाच्या स्नायूंना खेचत त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत काहीवेळात दक्षिण आफ्रिकेचा मेडिकल स्टाफ मैदानात आला.