आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात पराभूत करत जिंकले. हे त्यांचे आयपीएल इतिहासातील पाचवे विजेतेपद ठरले. त्यामुळे आयपीएलची ५ विजेतीपदं मिळवणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ देखील ठरला. त्यांच्या या यशामागील कारण काय असेल, याबद्दल भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने मत मांडले आहे.
बॅडले आणि सायमन ह्युजेस यांनी लिहिलेल्या आयपीएल आणि त्याच्या व्यवसायाचे मॉडेलवरील “ए न्यू इनिंग्स” या पुस्तक प्रकाशनाच्या वर्च्यूएल कार्यक्रमात द्रविडने सांगितले, ‘मुंबई इंडियन्सने मागील ४-५ वर्षात त्यांच्या दमदार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. मुळ संघ तसाच ठेवला आहे आणि त्याचे युवा खेळाडूंसह संमिश्रण केले आहे.’
द्रविड मुंबई इंडियन्सच्या यशाबद्दल म्हणाला, ‘मुंबईने जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या सारख्या खेळाडूंना ते युवा असतानाच संघाशी जोडले. त्यानंतर राहुल चाहर, इशान किशन, सुर्यकुमार यादव, हे खेळाडू आले. अनुभवी खेळाडू, टी२०मधील जागतिक दर्जाचे खेळाडू यांचा मिळून मुळ संघ बनवणे आणि युवा खेळाडूंसह त्यांचे संतुलन राखणे हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण आहे. त्यांनी हे काम खुप चांगल्यारितीने केले.’
तसेच आयपीएलबद्दल बोलताना द्रविड म्हणाला, ‘पहिल्यांदा जेव्हा युवा खेळाडूंना संधीची गरज होती, तेव्हा त्यांना राज्य संघाकडूनच ही संधी मिळायची. ते आपल्या राज्य संघाकडून रणजी ट्रॉफी खेळू शकत होते. आता आयपीएलमध्ये तूम्ही कर्नाटकचे असूनही पंजाबकडून खेळू शकता.’
द्रविड पुढे म्हणाला, ‘एक चांगले उदाहरण म्हणजे हरियाणा सारख्या राज्यातून तूम्ही असाल तर त्यांच्याकडे अमित मिश्रा, युजवेंद्र चहल, जयंत यादव आहे. त्यामुळे राहुल तेवतियासारख्या खेळाडूंना टी२० संघात जास्त संधी मिळाली नसती. पण आज तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याला कोणी थांबवू शकत नाही.’
राहुल द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“लोकांना दुखापतीबद्दल काही माहित नसते, त्यामुळे ते मुर्खपणाची बडबड करतात” – सौरव गांगुली
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची सरावाला सुरुवात, पाहा फोटो
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर