आयपीएलच्या मैदानात बुधवारी (१७ मे) मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादने धूळ चारली. सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ३ धावांच्या अंतराने हा सामना जिंकला. मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मयंक मार्कंडे आणि संजय यादव या दोन नवीन नावांचा समावेश दिसला. परंतु अर्जुन तेंडुलकरला मात्र आयपीएल पदार्पणासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. असे असले तरी, कर्णधार रोहितने त्याच्या पदार्पणाविषयी महत्वाचे संकेत मात्र दिले.
आयपीएल २०२२ हंगामातील हा ६५ वा सामना होता, जो मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वानखडे स्टेडियमचे खास नाते आहे. भारतीय संघाने त्यांचा इतिहासातील दुसरा विश्वचषक याच मैदानावर जिंकला होता. २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंका संघाला मात दिली होती. सचिनच्या मोठ्या करकिर्दीतील हा पहिलाच विश्वचषक होता. मुंबईला त्यांचा पुढचा आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना याच स्टेडियममध्ये खेळायचा आहे. अशात सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) या ऐतिहासिक मैदानावर आयपीएल पदार्पण करताना दिसू शकतो.
हैदराबादविरुद्धच्या सामन्याची नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आम्ही काही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. शेवटच्या सामन्यात देखील काही नवीन खेळाडूंना आजमावले जाईल.” रोहितच्या या वक्तव्यानंतर अर्जुनच्या पदार्पणाची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. समालोचकाची भूमिका पार पाडणारा हरभजन सिंग देखील म्हणाला की, “कमीत कमी एका सामन्यात तरी अर्जुनला संधी दिली गेली पाहिजे.”
मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे आणि अशात सनरायझर्स हैदराबदविरुद्ध मिळाली नाही, पण साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात अर्जुनला पदार्पणची संधी मिळेल, अशी अनेकांना आशा आहे. हैदराबादविरुद्ध मयंक मार्कंडे आणि संजय यादवला संधी दिल्यानंतर मुंबई चालू हंगामात आतापर्यंत एकून २२ खेळाडूंना संधी दिली आहे. मुंबईला त्यांचा पुढचा सामना २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळायचा आहे. प्लेऑफमधून बाहेर पडल्यामुळे हा त्यांचा हंगामातील शेवटचा सामना असेल.