भारतीय दिग्गज रविचंद्रन अश्विनने शुक्रवारी (२० मे) राजस्थान रॉयल्ससाठी महत्वाचे अष्टपैलू योगदान दिले आणि चेन्नई सुपर किंग्सला धूळ चारली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अश्विनने नाबाद ४० धावा केल्या. यासाठी त्याला सामनावीर देखील निवडले गेले. विजयानंतर अश्विनने त्याच्या धमाकेदार खेळीमागचा खुलासा केला.
सीएसकेने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १५१ धावांचे लक्ष्य दिले होते. राजस्थानने १०४ धावांवर त्यांच्या सुरुवातीच्या चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर रविचंद्र अश्विन (Ravichandran Ashwin) फलंदाजीसाठी आला आणि त्यांने संघाला विजय मिळवून देखील दिला. अश्विनने अवघ्या २३ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर अश्विनने त्याच्यामध्ये डेविड वॉर्नर अवतरला असल्याचे सांगितले.
चेन्नई सुपर किंग्जला मात दिल्यानंतर सामनावीर रविचंद्रन अश्विन म्हणाला की, “खूप चांगले वाटत आहे. आजचा सामना जिंकणे आमच्यासाठी खूप महत्वाचे होते. साखळी फेरीचा हा चांगला शेवट होता. स्पर्धेच्या आधीत चर्चा स्पष्ट होती की, मला अनेक गोष्टींवर काम करावे लागेल. संघ व्यवस्थापन माझ्या जागेविषयी निश्चित होते.”
“मला माहिती आहे की, माझी भूमिका काय आहे. मला फलंदाजांना जोखीम घेण्यासाठी भाग पाडावे लागते. मला नेहमी वाटते की, हा खेळ मला चांगल्या प्रकारे समजतो. मला माझा सर्वोत्तम खेळ खेळायचा आहे. मला आनंद आहे की, आमच्या संघाने प्लेऑफमध्ये क्वालीफाय केले आहे आणि त्यामुळे खूप खुश आहे. मी माझ्या आतमध्ये डेविड वॉर्रनला आणले होते,” असेही अश्विन पुढे बोलताना म्हणाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अश्विनने सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात फक्त फलंदाजी नाही, तर गोलंदाजीत देखील योगदान दिले. त्याने टाकलेल्या चार षटकांमध्ये २८ धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट घेतली. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने १९.४ षटकांमध्ये आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला.
राजस्थान रॉयल्स आता प्लेऑमध्ये पोहोचला असून त्यांना २४ मे रोजी क्वालीफायर सामना खेळायचा आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या गुणतालिकेतील पहिल्या दोन संघांमध्ये ही लढत होईल.