आयपीएल 2026 स्पर्धेचा (Indian premiere league 2026) थरार सध्या रंगला असून आतापर्यंत 39 सामने पूर्ण झाले आहेत. या हंगामात फलंदाजांची जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळत असून अनेक जुने विक्रम मोडीत निघत आहेत. मात्र, एवढं सगळं असूनही महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) या आयपीएलवर काहीसे नाराज आहेत आणि त्यांनी बीसीसीआयच्या (BCCI) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गावस्कर यांच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे गावस्कर यांच्या मते, काही नवीन नियमांमुळे आणि मैदानावर होणाऱ्या अनावश्यक हालचालींमुळे सामने वेळेत संपत नाहीत. अनेक सामने 3 तासांऐवजी चक्क 4 तासांपेक्षा जास्त काळ चालत आहेत. तसेच स्लो ओव्हर रेटसाठी बीसीसीआय दंड ठोठावत असूनही, सामन्यांना होणारा उशीर थांबलेला नाही. या दिरंगाईमुळे प्रेक्षकांचा संयम सुटत चालला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
गावस्कर यांनी विशेषतः मैदानावर खेळाडूंच्या अनावश्यक वावराची टीका केली आहे. सीमारेषेवर (Boundary) असलेल्या फील्डरला पाणी देण्यासाठी वारंवार राखीव खेळाडू मैदानावर येतात. यामुळे खेळाच्या वेळेत विनाकारण व्यत्यय येतो आणि मैदानावर 11 पेक्षा जास्त खेळाडू दिसतात. टाइम-आउट दरम्यान मैदानावर डझनावारी लोक येतात, ज्यात अद्याप फलंदाजीला न आलेले खेळाडूही असतात.
गावस्कर यांनी बीसीसीआयला या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. सध्याचा अडीच मिनिटांचा ‘स्ट्रॅटेजिक टाइम-आउट’ कमी करून 1 मिनिटाचा करण्यात यावा. तसेच खेळात होणारा हा हस्तक्षेप थांबवून क्रिकेटचे पावित्र्य जपले जावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.






