आयपीएलच्या 18व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या जेतेपदाच्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचा निकाल काहीही असला तरी, आयपीएल ट्रॉफी जिंकणारा संघ पहिल्यांदाच विजेतेपद जिंकू शकेल हे निश्चित आहे.
श्रेयस अय्यरने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून अशा विक्रमाचा भाग बनला, जो यापूर्वी कोणत्याही आयपीएल हंगामात फक्त तीन वेळा घडला होता. श्रेयस अय्यरने 12 सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. या हंगामात खेळल्या गेलेल्या एकूण 17 सामन्यांपैकी 12 सामन्यांमध्ये पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकली आहे. यासह, पंजाब किंग्ज एका हंगामात सर्वाधिक नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत एका विशेष यादीचा भाग बनला आहे.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंतच्या एका हंगामात सर्वाधिक नाणेफेक जिंकण्याच्या विक्रमाची पंजाब किंग्ज संघाने बरोबरी केली आहे. आतापर्यंत या यादीत फक्त कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जची नावे समाविष्ट होती, ज्यामध्ये 2013 मध्ये केकेआर आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी 12 सामन्यांमध्ये टॉस जिंकला होता, तर 2019च्या आयपीएल हंगामात सीएसकेने 12 सामन्यांमध्ये टॉस जिंकला होता. आता या यादीत पंजाब किंग्ज संघाचे नाव देखील समाविष्ट झाले आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी दाखवणाऱ्या पंजाब किंग्जचे डोळे त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीवर आहेत. दुसरीकडे, आयपीएलच्या गेल्या 17 हंगामातील अंतिम सामन्यांमध्ये टॉसनुसार सामन्याचा निकाल पाहिला तर 10 वेळा टॉस जिंकणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे, त्यामुळे पंजाब किंग्ज संघ हे वर्चस्व राखू शकेल की नाही, यावर सर्वांचे लक्ष असेल.






