भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने पाकिस्तान दौऱ्यावरील आठवणींना उजाळा देत, काही जुन्या गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी पाकिस्तानमध्ये खेळण्याचा अनुभव सांगत, एक नकोशी घटनाही सांगितली आहे. यावेळी इरफान म्हणाला की, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादच्या वक्तव्याने इरफानच्या वडीलांना दु:ख झाले होते.
इरफानने (Irfan Pathan) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना या गोष्टीचा खुलासा करत म्हटले, “मियाँदादच्या वक्तव्यामुळे त्याच्या वडिलांना खूप वाईट वाटले होते. भारताने २००३-०४मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान दौरा केला होता. तेव्हा पाकिस्तानचे नेतृत्व मियाँदाद (Javed Miandad) करत होते आणि त्यांनी म्हटले होते की, इरफानसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या गल्ली-गल्लीत मिळतात.”
मियाँदादचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर इरफानच्या वडिलांना खूप दु:ख झाले होते. एवढेच नाही तर, त्यांना कसोटी सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन मियाँदादला भेटायचे होते.
“मियाँदादच्या या वक्तव्याविषयीची माहिती आम्हाला वृत्तपत्र वाचताना समजली. ती बातमी वाचल्यानंतर मला आणि माझ्या वडिलांना अजिबात चांगले वाटले नव्हते,” असे इरफान यावेळी म्हणाला.
“मला पूर्णपणे आठवते की, दौऱ्यावरील शेवटचा सामना पाहण्यासाठी माझे वडील पाकिस्तानला आले होते. ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की मला पाकिस्तानच्या खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये जायचे आहे आणि मियाँदादला भेटायचे आहे. तर मी त्यांना म्हटले होते की, मला तिथे नाही जायचे,” असे मियाँदादविषयी बोलताना इरफान म्हणाला.
“पुढे जेव्हा मियाँदादने माझ्या वडिलांना पाहिले, ते उभे राहिले आणि माझ्या वडिलांना म्हणाले की, मी तुमच्या मुलाविषयी असे काहीही म्हटलेले नाही. त्यावेळी माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. ते मियाँदादला म्हणाले, मी इथे तुला काही म्हणण्यासाठी आलो नाही. मला फक्त तुला भेटायचे होते. तू खूप चांगला खेळाडू आहेस,” असेही इरफान पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-धोनीला २०११ विश्वचषकात युवराज किंवा युसुफला बसवुन या खेळाडूला घ्यायचं होतं संघात