इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चांगलीच स्पर्धा दिसत आहे. दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ ठरत आहेत. दुसऱ्या कसोटीत यजमान संघावर १५१ धावांनी विजय मिळवत, भारतीय संघाने दमदार खेळी केली होती. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा चांगलाच घाम काढला. भारतीय संघाला केवळ ७८ च्या धावसंख्येवर सर्वबाद केले.
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कोहलीच्या या निर्णयाला सपशेल फेल ठरवले. अँडरसनने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांना स्वस्तात बाद केले, ज्यामुळे इंग्लंडला चांगली सुरुवात मिळाली. हीच सुरुवात इंग्लंडने शेवटपर्यंत कायम ठेवली आणि भारतीय संघाला केवळ ७८ धावात गारद केले.
तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला चांगली सुरुवात मिळवून देणारा गोलंदाज अँडरसन हा इंग्लंडकडून सर्वाधिक जास्त कसोटी क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. अँडरसनने आता एवढा काळ कसोटी क्रिकेटमध्ये टिकून राहण्याचे रहस्य उलगडले आहे. ३९ वर्षीय जेम्स अँडरसनने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर याबाबत खुलासा केला.
याबाबत बोलताना अँडरसन म्हणाला, “वाढत्या वयामुळे मला वाटते की, मी जिम करण्यावर आणखीन मेहनत घ्यावी. मी आता सरावादरम्यान नेटवर फार कमी गोलंदाजी करतो. ज्यामुळे मला तेथील ऊर्जा सामन्यांमध्ये वापरायला फायदा मिळतो आणि हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.”
“कसोटी क्रिकेटमधील खरी अग्नीपरीक्षा ही असते की, स्वतःला जास्तीत जास्त षटकांची गोलंदाजी करता यावी. तसेच मानसिकरित्या दिवसभर कसोटी सामना खेळण्यासाठी स्वतःला तयार करणे हे आहे. त्यामुळे सामन्यांमध्ये मला चांगले प्रदर्शन करता यावे. यासाठी सरावादरम्यान नेटमध्ये जास्त ऊर्जा घालवत नाही. त्याऐवजी मी माझी सर्व ऊर्जा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये वापरतो,” असेही अँडरसन म्हणाला.
दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पहिल्या डावात अँडरसनने ५ विकेट घेतल्या होत्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. भारताच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांनी मैदानावर चांगले प्रदर्शन केले. ज्यामुळे अँडरसनला अतिरिक्त गोलंदाजी करावी लागली.
याबाबत बोलताना अँडरसन म्हणाला, “लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानातून माघारी येताना थोड्या अडचणी येत होत्या. मात्र मी माझ्या संघासाठी स्वतःमध्ये काही बदल करू शकलो याचा आनंद आहे.”
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या शेवटच्या फळीतील खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. त्यानंतर गोलंदाजीत देखील दमदार प्रदर्शन केले होते. ज्यामुळे भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. यानंतर इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवल्याचेही अँडरसनने सांगितले.
यावर अँडरसन म्हणाला, “दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर बाहेर ज्या काही गोष्टी चालू होत्या, त्याला आम्ही पूर्णपणे दुर्लक्षित केले. आम्ही पूर्णपणे केवळ आमच्या खेळावर लक्ष केंद्रित केले.”
दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकला. लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाने ४ विकेट गमावल्या होत्या. ज्यामुळे भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब राहिली. तसेच कोणताही फलंदाज भारतीय संघाचा डाव सावरू शकला नाही. ज्यामुळे भारतीय संघ ७८ च्या नीचांकी धावसंख्यावर गुंडाळला गेला.
भारतीय संघाकडून खेळताना रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावा केल्या. तर इंग्लंडकडून अँडरसनने आणि क्रेग ओव्हरटन ३-३ विकेट घेतल्या. तर सॅम करन आणि ऑली रॉबिन्सन ओव्हर्टन यांनी २-२ विकेट घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
–‘या’ आकडेवारीमुळे बांधले गेलेत कोहलीचे हात, फ्लॉप ठरुनही पुजारा अन् रहाणेला करु शकत नाही संघाबाहेर
–क्रिकेटमध्ये आता नवीन प्रयोग, ‘या’ लीगच्या सामन्यांमध्ये वापरला जाणार ‘स्मार्ट बॉल’!
–सात धावांवर बाद होऊनही विराटची आणखी एका विक्रमाला गवसणी