क्राईस्टचर्च। आज(2 मार्च) भारताला न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. हेगली ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात विजय मिळवण्याबरोबरच न्यूझीलंडने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0ने जिंकत भारताला व्हाईटवॉश दिला.
या सामन्यात भारताला दुसऱ्या डावात 124 धावाच करता आल्या. या डावात 46 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताकडून 11 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला जसप्रीत बुमराह धावबाद झाल्याने भारताचा डाव संपुष्टात आला. तो धावबाद झाल्याने एक नकोसा विक्रमही त्याच्या नावावर झाला आहे.
बुमराह याआधी 2018 ला इंग्लंड विरुद्ध द ओव्हलवर झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर धावबाद झाला होता. त्यामुळे तो कसोटी कारकिर्दीत 11 व्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून 2 वेळा धावबाद होणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
आत्तापर्यंत 14 भारतीय क्रिकेटपटू 11 क्रमांकावर फलंदाजी करताना धावबाद झाले. परंतू या क्रमांकावर 2 वेळा धावबाद होणारा बुमराह पहिलाच भारतीय आहे.
हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावातील 7 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात 124 धावा करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 132 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान न्यूझीलंडने दुसऱ्या डावाच्या 36 व्या षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत सामना जिंकला.






