मुंबई। शुक्रवारी (६ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ५१ वा सामना पार पडला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात ५ धावांनी मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. अखेरच्या षटकात गुजरातला ९ धावांची विजयासाठी गरज होती. पण डॅनियल सॅम्सने शानदार गोलंदाजी करत केवळ ३ धावा दिल्या आणि मुंबईला विजय मिळवून दिला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खूश आहे.
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हा आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) दहा सामन्यांतील दुसरा विजय होता. या विजयानंतर रोहित (Rohit Sharma) म्हणाला, ‘शेवटी हा अटीतटीचा सामना झाला होता. खूप वेळ आम्ही विजयाच्या प्रतिक्षेत होतो आणि कधी ना कधी नशीब पलणार होतेच. विजयाचे श्रेय सर्वांनाच जाते. आम्ही १५-२० धावा कमी बनवल्या. मधल्या षटकात गुजरातने चांगली गोलंदाजी केली. पण नंतर टीम डेव्हिडने चांगला शेवट केला. त्यानंतर दव पडणार होते, त्यामुळे आम्हाला माहित होते, या खेळपट्टीवर सामना सोपा असणार नाही.’
रोहित पुढे म्हणाला, ‘तुम्हाला सामन्यातील परिस्थिती पाहून गोलंदाजांना बदलण्याचा निर्णय घ्यावा लागतो. चेंडू बॅटवर चांगला येत होता. त्यामुळे आम्ही धीम्यागतीने गोलंदाजी करण्याची योजना आखली. आम्ही आत्ता केवळ एका एका सामन्यावर लक्ष देत आहोत, खूप पुढचा विचार करत नाही.’
डॅनियल सॅम्सचे (Daniel Sams) कौतुक करताना रोहित म्हणाला, ‘आम्ही आज सर्वोत्तम क्रिकेट खेळले नाही, यापेक्षा चांगले आम्ही खेळू शकलो असतो. डॅनियल सॅम्स सुरुवातीच्या सामन्यांनंतर दबावात होते. पण मला माहित आहे, की तो एक चांगला गोलंदाज आहे. बीबीएल आणि ऑस्ट्रेलियासाठी त्याने केलेला खेळ मी पाहिला आहे. त्यामुळे मी त्याला पाठिंबा दिला. एका कठीण हंगामातही आम्ही अंतिम ११ जणांमध्ये फार बदल करू इच्छित नाही. अंतिम षटकात ९ धावा वाचवणे सोपे नसते. सॅम्सने चांगली गोलंदाजी केली.’
मुंबईने जिंकला सामना
या सामन्यात (GT vs MI) गुजरातने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७७ धावा केल्या. त्यांच्याकडून इशान किशनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तसेच रोहितने ४३ धावांची खेळी केली, तर टीम डेव्हिडने आक्रमक खेळ करत नाबाद ४४ धावा ठोकल्या. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी केल्या. साहाने ५५ आणि गिलने ५२ धावा केल्या. या दोघांनी सलामीला १०६ धावांची सलामी भागीदारी देखील रचली. पण, हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांना आक्रमक खेळ करता आला नाही, त्यामुळे गुजरातला २० षटकात ५ बाद १७२ धावा करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना जिंकला. मुंबईकडून मुरूगन अश्विनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघ इंग्लंडनंतर जाणार वेस्ट इंडिज दौऱ्याला, पाहा कसे असेल वेळापत्रक
मुंबईविरुद्ध सामना गमावला, पण गुजरातसाठी साहा-गिल जोडी ठरली ‘लय भारी’; रचली ऐतिहासिक भागीदारी