श्रीलंकेचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून २ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सध्या सेंच्यूरियन येथे सुरु आहे. मात्र याच दरम्यान श्रीलंकेला खेळाडूंच्या दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. त्यांचे ६ खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे आता त्यांचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या सामन्यात आधीच श्रीलंका अँजेलो मॅथ्यूज आणि सुरंगा लकमल या खेळाडूंशिवाय खेळत आहे. त्यांना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यात या सामन्यावेळी धनंजय डी सिल्वा सर्वात आधी दुखापतग्रस्त झाला. त्याला झालेल्या माडींच्या दुखापतीमुळे केवळ या सामन्यातूनच नाही तर मालिकेतूनच बाहेर पडावे लागले आहे. तो या सामन्यात ७९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला.
त्याच्यानंतर श्रीलंकेचे कसुन रजीथा, लहिरु कुमारा, वनिंदू हसरंगा आणि दिनेश चंडिमल हे देखील दुखापतग्रस्त झाले. त्यातील हसरंगा नंतर पुन्हा सामना खेळण्यासाठी परतला.
पण अशा परिस्थितीबद्दल आर्थर यांनी चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की “कोविड -१९च्या बदली खेळाडूबाबत मी आयसीसी क्रिकेट समितीशी या कसोटी सामन्यानंतर चर्चा करणार आहे. भारताचाही एक गोलंदाज (उमेश यादव) सामना सुरु असताना दुखापतग्रस्त झाला. मला शंका आहे की आणखी संघ जसजसे पुढे जातील तसे तसे त्यांच्या वेगवान गोलंदाजांना दुखापत होईल. कोरोना व्हायरसच्या कारणाने त्यांच्यावर अधिक कामाचा ताण पडत आहे.”
तसेच ते म्हणाले, ‘जगात सर्व सुरळीत असते तर ही समस्या आली नसती. आमच्या संघात सध्या ७ खेळाडू तंदुरुस्त आहेत. त्यातही जर चंडिमल बाहेर गेला तर हा सामना संपवण्यासाठी आमचे केवळ ६ खेळाडू तंदुरुस्त असतील. मला शंका आहे की चंडिमलला केवळ क्रॅम्प आलेला नाही, त्याला त्यापेक्षा जास्त दुखापत आहे.’ तसेच त्यांनी लंका प्रीमीयर लीग कसोटी मालिकेच्या आधी होणे योग्य नव्हते असेही म्हटले, पण याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की ती स्पर्धा आर्थिकदृष्ट्या होणे महत्त्वाचे होते.
पुढे उपहासात्मक बोलताना ते म्हणाला, ‘सुदैवाने आम्ही २१ खेळाडूंना बरोबर घेऊन आलो. नाहीतर फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवरला तिसऱ्या क्रमांकावर आणि मला चौथ्या क्रमांकावर पुढच्या सामन्यासाठी उतरावे लागले असते. हे आहे असेच आहे. आम्हाला यातूनच काम करावे लागेल. आशा आहे की आमच्या काही खेळाडूंना गंभीर दुखापत नसावी.’
पहिल्या कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने ६२१ धावा करत २२५ धावांची आघाडी घेतली. या सामन्याचा तिसरा दिवस संपला तेव्हा श्रीलंका दुसऱ्या डावात २ बाद ६५ धावांवर खेळत होते.
महत्त्वाच्या बातम्या –
समय आ गया है आपसे विदा लेने का..! अगरवालच्या खराब फलंदाजीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
कर्णधार असावा तर असा ! अजिंक्यच्या ‘त्या’ निर्णयाने जिंकली सर्वांची मने
डावखुऱ्या फलंदाजांसाठी आर अश्विन धोक्याची घंटा, कसोटीत केलाय हटके ‘विश्वविक्रम’