जयपूर। गुरुवारी(11 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 25 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने 4 विकेट्सने विजय मिळवला. मात्र नेहमी शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी अचानक या सामन्यात चिडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
या सामन्यात धोनीने मैदानावर येत पंचाबरोबर नो बॉल प्रकरणी घातलेला वाद त्याला चांगलाच महागात पडत आहे. त्याला या प्रकरणी 50 टक्के मॅच फीचा दंड करण्यात आला आहे.
मात्र या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या पंचाकडे का गेला होता, याबद्दल खूलासा केला आहे.
ते म्हणाले ‘आमच्या समजूतीप्रमाणे गोलंदाजाच्या बाजूला उभ्या असणाऱ्या पंचांनी नो बॉलचा इशारा केला होता आणि परत गोंधळ झाला की तो नो बॉल होता की नाही. धोनीला स्पष्टता हवी होती आणि असे वाटत होते की काहीही प्रतिक्रिया मिळत नव्हती. त्यामुळेच धोनीने मैदानात जाऊन पंचांशी चर्चा केली. हेच मी पाहिले आणि धोनीशी सामन्यानंतर चर्चा केली.’
फ्लेमिंग यांनी धोनीनेे मैदानात जाण्याचा निर्णय रागात घेतला असल्याचे मान्य केेले पण त्याचबरोबर त्यांनी धोनीचा बचावही केला आहे.
ते म्हणाले, ‘धोनीला फक्त स्पष्टता हवी होती. मला विश्वास आहे की धोनीसह सर्वच लोकांनी योग्य आणि अयोग्य निर्णयाबाबत विचार केला असेल. पण मला वाटते की पंचांनी या घटनेनंतर याबद्दल चर्चा केली असेल. मी तूमच्यासारखाच त्यावेळी दर्शक होतो.’
‘ज्याप्रकारे निर्णय घेण्यात आला, त्यामुळे धोनीला राग नक्कीच आला. त्याला समजत नव्हते की नो बॉलचा निर्णय देण्यात आला आणि परत तो बदलण्यात आला. त्यामुळे स्पष्टता नसल्याने तो मैदानात गेला. ती स्थिती नाजूक होती. सामना कोणताही संघ जिंकू शकत होता.’
‘धोनीने जे केले के नक्कीच सामान्य नव्हते. पण ही अशी घटना आहे की यावर त्याला बराच काळ प्रश्न विचारला जाणार आहे.’
राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने धोनीच्या कृत्यावर नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की ‘मला माहित नाही त्याने आज जे केले ते बरोबर होते की नाही. आयपीएलमध्ये दबाव असतोच आणि प्रत्येक धाव मोजली जाते. सामन्यातील तो मोठा क्षण होता. पण त्यावेळी त्याने मैदानावर येणे योग्य नव्हते.’
नक्की झाले काय?
राजस्थानने चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना धोनी 20 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 58 धावांवर असताना बाद झाला. त्याला बेन स्टोक्सने बाद केले.
यावेळी धोनी बाद झाल्यानंतर पुढचाच चेंडूवर मैदानावरील पंच उल्हास गंधे नो बॉलचा इशारा केला, पण लगेचच स्वेअर लेगवरील पंच ब्रुस ऑक्सनफॉर्डशी चर्चा करुन हा नो बॉलचा निर्णय बदलला. त्यामुळे मैदानात असलेला रविंद्र जडेजा पंचाशी वाद घालू लागला. काही वेळीत धोनीही मैदानात आला, त्याने पंचाशी चर्चा करत वाद घातल्याचे दिसले.
मात्र पंचांनी निर्णय बदलला नाही. त्यामुळे चेन्नईला नो बॉल मिळाला नाही. अखेर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना मिशेल सँटेनरने षटकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
–भर मैदानात अंपयारशी वाद एमएस धोनीला पडला महागात…
–ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी…
–सुरेश रैनाच्या त्या विक्रमाची बरोबरी करण्याची रोहित शर्माची संधी हुकली!