30 मेपासून विश्वचषक 2019 ची स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता या विश्वचषकासाठी सर्व संघांनी एकएक करत संघ घोषित करायला सुरुवात केली आहे. 23 एप्रिल ही 15 जणांचा संघ घोषित करण्याची अंतिम तारीख आहे.
या विश्वचषकासाठी 15 एप्रिलला मुंबईत भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी संघात जागा पक्की करण्यासाठी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन निवड समीतीला प्रभावित करण्याचा विचार अनेक खेळाडूंनी केला असेल.
परंतू निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आयपीएलमधील कामगिरी विश्वचषकासाठी जास्त विचारात घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार प्रसाद म्हणाले, ‘नाही, मला नाही वाटत आम्ही आयपीएलमधील कामगिरीचा विचार करत आहोत.’ यानंतर जेव्हा प्रसाद यांना विचारण्यात आले की आयपीएलमधील दमदार कामगिरी संघातील अनिश्चित जागा नक्की करण्यासाठी मदत करतील का, यावर प्रसाद म्हणाले, ‘खरंतर नाही, आम्ही बऱ्यापैकी स्पष्ट आहोत.’
भारतीय संघाला सध्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सतावत आहे. भारताने या क्रमांकावर अनेक प्रयोग करुन पाहिले आहेत. त्यामुळे आता चौथ्या क्रमांकासाठी कोणाला संघात स्थान मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रसाद यांच्याप्रमाणेच याआधीच भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने हीच गोष्ट स्पष्ट केली आहे. त्यानेही म्हटले होते की टी20 लीग ही वनडे विश्वचषकासाठी संघ निवडताना निकष असू शकत नाही.
रोहित म्हणाला, ‘मला वाटते आयपीएल हे भारतीय संघ निवडताना निकष असू नये. तूम्ही 50 षटकांच्या प्रकारासाठी 20 षटकांच्या स्पर्धेचा निकष लावत संघ निवडू शकत नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.’
‘आयपीएल हे फ्रान्चायझी क्रिकेट आहे. पण फॉर्म नक्कीच महत्त्वाचा आहे. पण मागील चार वर्षे आम्ही चांगले वनडे आणि टी20 क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे आम्हाला हवे असणारे खेळाडू समजून घेण्यासाठी ते पुरेसे आहे.’
भारतीय संघाच्या निवडीसाठी मुंबईत 15 एप्रिलला निवडसमीतीची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे 15 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
त्यामुळे भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीही विश्वचषकासाठी अंतिम संघाची निवड करताना निवड समीतीबरोबर उपस्थित राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–प्रो कबड्डी २०१९ मध्ये एकाच संघाकडून खेळणार देसाई बंधू!
–हरभजननने सांगितला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील हा मोठा फरक
–अश्विन विरुद्ध ‘मंकडींग’ पासून वाचण्यासाठी अशी घेतली वॉर्नरने खबरदारी, पहा व्हिडिओ