मुंबई इंडियन्स संघ हा इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आतापर्यंत ५ वेळेस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत. परंतु इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेत अनेक मोठ मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांची एंट्री झाली आहे. तर खेळाडूंचा मेगा लिलाव देखील पाहायला मिळणार आहे. या लिलाव सोहळ्यापुर्वी सर्व संघांना ४ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स संघाने देखील आपल्या ४ खेळाडूंची निवड केली आहे.
सर्व संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांना रिलीज करण्याची दाट शक्यता आहे. हे दोन्ही खेळाडू आगामी हंगामात दुसऱ्या संघात खेळताना दिसून येऊ शकतात. तसेच मुंबई इंडियन्स संघातील सर्वात विश्वासू खेळाडू सूर्यकुमार यादव देखील आयपीएल २०२२ स्पर्धेत दुसऱ्या संघात खेळताना दिसून येऊ शकतो.
मुंबई इंडियन्स संघ या ४ खेळाडूंना करू शकतो रिटेन
माध्यमातील वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन करू शकतो. परंतु, याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. कायरन पोलार्डऐवजी दुसऱ्या कुठल्या परदेशी खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.
आगामी लिलावात देखील मुंबई इंडियन्स संघ पूर्ण प्रयत्न करणार आहे की, ज्या खेळाडूंनी गेली अनेक वर्ष मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले, त्याच खेळाडूंना संघात स्थान मिळाले पाहिजे. मुंबई इंडियन्स संघ सूर्यकुमार यादवला देखील पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, स्पर्धेचे नियम पाहता याची शक्यता कमी आहे. या लिलावात सूर्यकुमार यादववर देखील मोठी बोली लागू शकते.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने २०१३,२०१५,२०१७,२०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या संघात असे अनेक खेळाडू आहेत,जे सुरुवातीपासून या संघासोबत आहेत. परंतु आयपीएल २०२२ स्पर्धेत हे खेळाडू दुसऱ्या संघांमध्ये खेळताना दिसून येऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पणात भीषण अपघात, आफ्रिदीचा बाऊंसर डोक्याला लागल्याने बांगलादेशचा खेळाडू गंभीर जखमी
द्रविडने केएस भरतविषयी केली होती ‘ही’ भविष्यवाणी, व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितला किस्सा