बांगलादेशनं 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. बांगलादेशचा हा विजय ऐतिहासिक आहे, कारण संघानं प्रथमच कसोटीत पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
बांगलादेशच्या या विजयात अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमनं महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं 191 धावांची दमदार खेळी खेळली, ज्यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर मुशफिकुरनं मोठी घोषणा केली. त्यानं बांगलादेशातील पूरग्रस्तांसाठी बक्षिसाची रक्कम दान करणार असल्याचं सांगितलं आहे.
मुशफिकुर रहीमनं सामन्यानंतर बोलताना आपल्या खेळीवर प्रतिक्रिया दिली. यासोबतच त्यानं बक्षिसाची रक्कम दान करण्याची घोषणाही केली. मुशफिकुर म्हणाला, “ही माझ्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. सर्व खेळाडूंनी चांगली तयारी केली होती. मी कोचिंग स्टाफ आणि व्यवस्थापनाचा आभारी आहे. मला एक घोषणा करायची आहे. मी माझ्या पुरस्काराची रक्कम बांगलादेशातील पूरग्रस्तांना देईन.”
बांगलादेशच्या पहिल्या डावात मुशफिकुरनं दमदार फलंदाजी केली होती. त्यानं 341 चेंडूंचा सामना करत 191 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 22 चौकार आणि 1 षटकार लगावला. बांगलादेशने पहिल्या डावात 565 धावा केल्या. तत्पूर्वी, पाकिस्ताननं पहिल्या डावात 448 धावा केल्या होत्या. यानंतर संघानं डाव घोषित केला. दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ 146 धावांवर गारद झाला. बांगलादेशनं दुसऱ्या डावात अवघ्या 30 धावा करून सामना जिंकला.
या पराभवामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत संघ आठव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात असून दुसरा सामना 30 ऑगस्टपासून होणार आहे. हा सामनाही रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
हेही वाचा –
बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या
बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की
शाकिब अल हसननं पुन्हा संयम गमावला, मैदानावरील या कृतीनं सगळेच हैराण