साउथॅम्प्टनच्या मैदानावर येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्हीही संघ सज्ज झाले आहेत. तसेच दोन्हीही संघांनी आपापला कसोटी संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु भारतीय संघासाठी सलामीला फलंदाजी कोण करणार? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भारतीय संघात केएल राहुल, मयंक अगरवाल, शुबमन गिल आणि रोहित शर्मा या ४ सलामीवीर फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. चला तर पाहू कशी असू शकते, अंतिम सामन्यात भारतीय संघाची सलामी जोडी?
१) रोहित शर्मा – शुबमन गिल
रोहित शर्मा हा गेल्या काही सामन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटच्या दोन कसोटी सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्याला शुबमन गिलने चांगली साथ दिली होती. या दोघांनी मिळून सुरुवातीला भक्कम भागिदारी केल्याने संघ मजबूत स्थितीत आल्याचे दिसले होते. गेल्या काही सामन्यात एकत्र खेळत असल्यामुळे संघ व्यावस्थापक याच जोडीवर विश्वास दाखवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील हे दोघे चांगल्या फॉर्म मध्ये असल्याचे दिसून आले होते.
२) रोहित शर्मा – केएल राहुल
आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप-३ फलंदाजांमध्ये असलेल्या केएल राहुलला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले होते. परंतु असे म्हटले जात आहे की, अपेंडिक्सचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तो एकदम फिट आहे. त्याची आयपीएल २०२१ स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी पाहता भारतीय संघ व्यावस्थापक आणि विराट कोहली नक्कीच रोहित शर्मा आणि केएल राहुलला शुबमन गिल ऐवजी अंतिम ११ जणांमध्ये स्थान देऊ शकतात.
३) रोहित शर्मा – मयंक अगरवाल
पंजाब किंग्ज संघाचा धडाकेबाज फलंदाज मयंक अगरवाल याने आयपीएल २०२१ स्पर्धेत केएल राहुलसोबत मिळून सलामीला उल्लेखनीय कामगिरी केली होती. केएल राहुल दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकल्यानंतर पंजाबचे सूत्र मयंकच्या हाती देण्यात आले होते. त्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीचा स्तर आणखी उंचावला होता. यावरून स्पष्ट होते की, तो चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याची विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा हे दोघे ही भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकतात.
४) शुबमन गिल – मयंक अगरवाल
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अटीतटीचा सामना पाहायला मिळणार यात काहीच शंका नाही. सलामी फलंदाज लवकर बाद होऊन माघारी परतले; तर मध्यक्रमात धावफलक हलते ठेवण्यासाठी मध्यक्रमात अनुभवी फलंदाजाची आवश्यकता आहे. त्यामुळे मयंक अगरवाल आणि शुबमन गिल यांना सलामी फलंदाजी करण्याची जबाबदारी देण्यात येण्याचीही शक्यता आहे. तर, रोहित शर्मा मध्यक्रमात येऊन मोठ्या आकडी धावा करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रोहित शर्माला इंग्लंडमध्ये कसोटीत खेळणं जाणार महाकठीण, कारण…’
संधीची प्रतिक्षा! तब्बल २३७ विकेट्स अन् १३११ धावा, ‘सौराष्ट्रचा जडेजा’ ठोठावतोय टीम इंडियाचं दार
एका अटीमुळे ‘गुरुजीं’नी गमावले होते आपले प्रेम, साखरपुड्यानंतर अभिनेत्रीने मोडले होते लग्न!