इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका अत्यंत रोमांचक स्थितीत पोहचली आहे. दोन्ही संघांना या मालिकेत विजय मिळवण्याची समान संधी आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर इंग्लंड संघाने जोरदार पुनरागमन करत तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत केले आहे. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे.
त्यामुळे चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तसेच भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत,ज्यांच्यासाठी हा सामना संघात टिकून राहण्याची शेवटची संधी ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल. (Oval test would be a last chance for these 3 indian players)
ईशांत शर्मा :
ईशांत शर्मा हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्याने गेल्या काही महिन्यांपासून चांगली कामगिरी केली असली, तरी देखील या मालिकेत फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाहीये. लीड्स कसोटीत त्याने एकूण २२ षटक गोलंदाजी केली होती. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यामुळे त्याला जर ओव्हल कसोटीत खेळण्याची संधी मिळाली तर, त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त झाल्यानंतर ईशांत शर्माला संधी देण्यात आली होती. परंतु ईशांत शर्माने खेळलेल्या ५ डावात त्याला अवघे ५ गडी बाद करण्यात यश आले होते. परंतु चौथ्या कसोटी सामन्यात तो फ्लॉप ठरला तर, त्याच्या चिंतेत वाढ होऊ शकते.
अजिंक्य रहाणे :
या यादीत सर्वोच्च स्थानी अजिंक्य रहाणेचे नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अजिंक्य रहाणे साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत देखील तो फ्लॉप ठरला आहे. त्याने शेवटचे शतक ऑस्ट्रेलियामध्ये ॲडीलेडच्या मैदानावर झळकावले होते. परंतु त्यानंतर तो संघर्ष करताना दिसून येत आहे.
इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने ६१ धावांची खेळी केली होती. परंतु त्यानंतर पुढील सामन्यात तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला होता. तसेच लीड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याला अवघ्या १८ तर दुसऱ्या डावात त्याला अवघ्या १० धावा करण्यात यश आले होते. अशीच कामगिरी त्याने चौथ्या कसोटी सामन्यात देखील सुरू ठेवली तर, त्याच्या चिंतेत नक्कीच वाढ होऊ शकते.
चेतेश्वर पुजारा :
भारतीय कसोटी संघातील मुख्य फलंदाज चेतेश्वर पुजाराचा देखील या यादीत समावेश आहे. पुजारा ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याला अवघ्या २ डावात चांगली फलंदाजी करता आली आहे. त्याने लॉर्ड्स कसोटीत अजिंक्य रहाणेसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी करत ४५ धावांची खेळी केली होती. तर लीड्स कसोटीत त्याने ९१ धावांची खेळी केली होती.
परंतु या सामन्यातील चौथ्या दिवशी एकही धाव न करता माघारी परतला होता. पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव संपुष्टात आला होता आणि भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात देखील तो फ्लॉप ठरला तर, त्याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताला सर्वाधिकवेळा धोबीपछाड देणारे ‘हे’ आहेत संघ
यष्टीमागे अन् यष्टीपुढेही यांचा धाक! क्रिकेटविश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारे ४ विकेटकीपर