पाकिस्तानविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशनं 10 विकेटनं विजय मिळवून इतिहास रचला आहे. कसोटी इतिहासात बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय आहे.
बांगलादेशच्या या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची लढाई रोमांचक झाली आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान अजूनही फायनलच्या शर्यतीत आहेत. परंतु जर त्यांनी उरलेल्या सामन्यांपैकी एकही गमावला तर त्यांच्यासाठी अडचणी सुरू होतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एकूण 9 संघ सहभागी होतात आणि अंतिम सामना अव्वल दोन संघांमध्ये खेळला जातो. अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.
बांगलादेशविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर होता. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 36.66 होती. पण मँचेस्टर कसोटीत इंग्लंडनं श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानची सातव्या क्रमांकावर घसरण झाली. तर बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान गुणतालिकेत आठव्या स्थानावर आला आहे. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी आता 30.56 आहे. पाकिस्ताननं सहा कसोटी सामने खेळले, ज्यापैकी संघानं दोन जिंकले तर चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय.
पाकिस्तानला विजयाची टक्केवारी 60 टक्क्यांच्या वर ठेवण्यासाठी आणि अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. उरलेल्या सामन्यांपैकी एकही सामना पाकिस्ताननं गमावला, तर यावेळीही अंतिम फेरी गाठण्याचं त्यांचं स्वप्न स्वप्नच राहील.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर पाकिस्तानला आणखी तीन मालिका खेळायच्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 मध्ये पाकिस्तान एकूण सहा मालिका खेळणार आहे. पाकिस्तानला आगामी काळात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात मालिका खेळायच्या असून दक्षिण आफ्रिकेचा दौराही करायचा आहे.
दुसरीकडे, बांगलादेशही फायनलच्या शर्यतीत आहे. ही कसोटी सुरू होण्यापूर्वी बांगलादेशची विजयाची टक्केवारी 25 टक्के होती. अशा स्थितीत या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बांगलादेश गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आला आहे. बांगलादेशची विजयाची टक्केवारी आता 40 टक्क्यांवर पोहोचली आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताचं वर्चस्व कायम आहे. भारतानं आतापर्यंत 9 सामने खेळले, ज्यापैकी 6 जिंकले तर 2 सामन्यात पराभव पाहिला. एक सामना अनिर्णित राहिला. भारताचे एकूण गुण 74 असून विजयाची टक्केवारी 68.52 आहे, जी इतर संघांपेक्षा खूप जास्त आहे.
हेही वाचा –
सामनावीराची बक्षीस रक्कम पूरग्रस्तांना दान, बांगलादेशच्या फलंदाजाचा कौतुकास्पद निर्णय
बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या
बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की