---Advertisement---

डे-नाईट टेस्ट कसोटी क्रिकेट खेळण्याचा हा एकमेव मार्ग बनू नये – विराट कोहली

On: गुरूवार, नोव्हेंबर 21, 2019 8:43 PM
---Advertisement---

उद्यापासून(22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघातील दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याआधी बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिवस-रात्र कसोटी ही चांगली गोष्ट आहे पण कसोटी क्रिकेट फक्त मनोरंजनासाठी नसल्याचे म्हटले आहे.

दिवस-रात्र कसोटीबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘दिवस-रात्र कसोटी ही एकमेव मार्ग नाही. हे कसोटी क्रिकेट खेळण्याचा हा एकमेव मार्ग बनू नये. त्यामुळे, आपण सकाळच्या पहिल्या सत्रातील रोमांच पाहण्याची मजा गमावू.’

त्याचबरोबर विराट म्हणाला, ‘तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये उत्साह निर्माण करू शकता परंतु केवळ मनोरंजनावर आधारित कसोटी क्रिकेट बनवू शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये एका सत्रात टिकून राहण्याचा प्रयत्न करणारा फलंदाज असतो आणि दुसरीकडे गोलंदाज फलंदाजांना बाद करण्यासाठी प्रयत्न करत असतात, हे कसोटी क्रिकेटमधील मनोरंजन आहे.’

‘जर लोक या मनोरंजनाला प्रतिसाद देत नसतील तर ही खूप वाईट गोष्ट आहे. जर मला कसोटी क्रिकेट आवडत नसेल तर त्यासाठी तूम्ही दबाव आणू शकत नाही. ज्यांना बॅट आणि बॉल तसेच कसोटी क्रिकेटमधील उत्तम सत्र यांच्यातील लढाईचा आनंद घेता येतो, त्याच लोकांनी कसोटी क्रिकेट येऊन पहावे कारण ते मैदानात काय सुरु आहे हे समजू शकतील, असे माझे मत आहे’, असेही विराटने म्हटले आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश संघात उद्यापासून होणारा कसोटी सामना हा भारताचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. त्यामुळे हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---