भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेला उद्यापासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे सुरुवात होईल. मालिकेतील हा पहिला सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जाईल. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. मात्र, सामन्याच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स याने गुलाबी चेंडूमुळे दोन्ही कर्णधाराची खरी परीक्षा होईल असे म्हटले आहे. कमिन्सचे म्हणणे आहे की, गुलाबी चेंडूचा वेग काहीसा वेगळा असतो.
दिवस-रात्र कसोटीत कर्णधारांची परीक्षा
ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार असलेला कमिन्स एका मुलाखतीत आगामी मालिकेविषयी बोलत होता. त्यावेळी तो म्हणाला, “या सामन्यासाठी आम्ही उत्साही आहोत. आमच्यातील एकही खेळाडू निराश नाही. ही कसोटी इतर कसोटींपेक्षा काहीशी वेगळी असेल. प्रकाशझोतात गुलाबी चेंडू वेगळी गती पकडतो. जेवणानंतर ज्यावेळी लाईट चालू होतील तेव्हा, चेंडू अधिक उंची आणि गती प्राप्त करेल.”
कमिन्सने आपले म्हणणे पुढे नेताना सांगितले, “अशावेळी कर्णधारांची परीक्षा असेल. फलंदाजी केव्हा करायची आणि गोलंदाजी केव्हा करायची, याचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावे लागतील. भारताने मागील वेळी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या नावे केली होती. मात्र, त्यावेळी वॉर्नर व स्मिथ संघाचा भाग नव्हते. यावेळी ऑस्ट्रेलियाला जिंकण्याची संधी आहे. आम्ही मायदेशातील सर्व मालिका जिंकण्याचा प्रयत्न करत असतो.”
ऑस्ट्रेलियाला आहे दिवस-रात्र कसोटी खेळण्याचा अनुभव
ऑस्ट्रेलियाने यापूर्वी चार दिवस-रात्र कसोटी जिंकल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी अनुक्रमे न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तान यांना पराभूत केले आहे. भारताने आपला एकमेव दिवस-रात्र कसोटी सामना मागील वर्षी बांगलादेश विरुद्ध कोलकाता येथे खेळला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवलेला. ऍडलेडमध्ये होणारा सामना भारताचा भारताबाहेरील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असेल.
संबधित बातम्या:
– बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– एक नजर इकडेही टाका! १२० पेक्षा अधिक देशात पाहिली जाणार भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका