सनरायझर्स हैदराबाद संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवला. या सामन्यात, या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या २४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने पहिल्याच षटकात तीन बळी घेऊन इतिहास रचला आहे. आयपीएल २०२६ हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रफुल्ल हिंगेला ३० लाख रुपयांना विकत घेतले होते, त्यानंतर त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआन ड्रे प्रिटोरियस यांना पहिल्याच षटकात शून्यावर बाद करून आयपीएलमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे.
२४ वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रफुल्ल हिंगे देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. तो नागपूरचा रहिवासी आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी, त्याला सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांनी चाचण्यांसाठी आमंत्रित केले होते, ज्यानंतर हैदराबादने त्याची प्रतिभा ओळखून त्याला आपल्या संघात स्थान दिले. हिंगेच्या देशांतर्गत कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने १० प्रथम-श्रेणी सामने, सहा लिस्ट ए सामने आणि दोन टी२० सामने खेळले आहेत. त्याने गेल्या वर्षी आंध्र प्रदेशविरुद्ध टी२० मध्ये पदार्पण केले. आता तो या फॉरमॅटमध्ये आयपीएलमधील आपला दुसरा सामना खेळत आहे. त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये २७ बळी घेतले आहेत, तर लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर पाच बळी आहेत.
प्रफुल्ल हिंगेचे स्वप्न फलंदाज बनण्याचे होते, पण त्याच्या उंचीचा विचार करून त्याच्या वडिलांनी त्याला गोलंदाज बनण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. २०२२ पासून हिंगे चेन्नईतील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि २०२४ मध्ये तो १५ दिवसांच्या शिबिरासाठी ब्रिस्बेनलाही गेला होता. ईशान किशनने जाहीर केले होते की पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात हिंगेचा समावेश केला जाईल, पण नंतर त्याने इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत जयदेव उनाडकटचा समावेश केला. मात्र, या सामन्यात हिंगे आपले कौशल्य दाखवू शकला.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या डावात फलंदाजी करताना ईशान किशनच्या ९१ धावांच्या जोरावर संघाने मर्यादित २० षटकात २१६ धावांचा डोंगर उभा केला. लक्षाचा पाठलाग करताना राजस्थान संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाने पाच धावांवर आघाडीचे चारही फलंदाज बाद गमावले, या झटक्यातून राजस्थान संघ कमबॅक करू शकला नाही. शेवटी संघाचा ५७ धावांनी पराभव झाला.






