इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघात टी२० मालिकेचा थरार सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (१९ मार्च) १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात कर्नाटकचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याची निवड करण्यात आली आहे. यानंतर कृष्णाने भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या जुन्या वक्तव्याची आठवण काढली आहे.
विराटने २०२० च्या सुरुवातीला एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, “एक व्यक्ती ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२० साठी सरप्राइज पॅकेज असणार आहे. कोण तरी आहे, जो वेगाने गोलंदाजी करू शकतो आणि चेंडूला उसळी देण्याची क्षमता राखतो. तो व्यक्ती प्रसिद्ध कृष्णा असून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे. क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपासाठी गोलंदाजांचा भक्कम समूह असणे नेहमी फायद्याचे ठरते. टी२० विश्वचषकासाठी आमच्याकडे मुबलक पर्यात उपलब्ध आहेत.”
अर्थात विराटने कृष्णाला टी२० विश्वचषक २०२० मध्ये भारतीय संघाकडून संधी मिळण्याचे संकेत दिले होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे हा विश्वचषक पुढे ढकलण्यात आला असून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतातच या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे.
विराटच्या या शब्दांना उजाळा देत आयएएनएसशी बोलताना कृष्णा म्हणाला की, “विराटच्या या शब्दांनी माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. मला वाटत होते की, स्वत: भारतीय संघाच्या कर्णधाराने माझा उल्लेख केला. म्हणजे अजून जास्त मेहनत केल्यानंतर कधी-ना-कधी मला संघ व्यवस्थानाकडून फोन येणार आणि तसेच झाले. याचमुळे माझा आत्मविश्वास अजून जास्त वाढला आहे. माझ्या सरावामुळेही माझ्या प्रेरणेचा स्तर उंचावला आहे.”
विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरीने वेधले लक्ष
कर्नाटकचा २५ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने विजय हजारे ट्रॉफी २०२१ मधील प्रदर्शनाने निवडकर्त्यांना प्रभावित केले आहे. या स्पर्धेत कर्नाटक संघाकडून खेळताना ७ सामन्यात २२.२च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या आहेत. कर्नाटककडून या स्पर्धेत त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर कर्नाटक यावेळी विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहचला होती. उपांत्य फेरीत मात्र कर्नाटकला मुंबईकडून ७२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातही प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
अशात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाज वनडे संघाचा भाग नाहीत. यामुळे कृष्णाला इंग्लंडविरुद्ध वनडेत अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटची दुखापत ठरणार फायद्याची! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारत जिंकणार अंतिम टी२० लढत?
नव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा नवा रंग, खास व्हिडिओ शेअर करत लॉन्च केली नवी जर्सी
“टी२० विश्वचषकात आम्हाला मोठमोठे संघही घाबरतील,” इंग्लंडच्या प्रशिक्षकाची चेतावणी






