भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या २०२१च्या हंगामातील उपांत्य फेरीचे सामने आज खेळवण्यात येत आहेत. यातील दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि कर्नाटक या स्थानिक क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघांमध्ये दिल्लीच्या पालम मैदानावर खेळवण्यात येत आहे.
याही सामन्यात मुंबईचा प्रभारी कर्णधार पृथ्वी शाॅने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखताना आणखी एक शतक झळकावले आहे. पृथ्वीने या सामन्यात सलामीला येऊन १२२ धावांत १६५ धावांची आक्रमक खेळी उभारली. विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामातील त्याचे हे चौथे शतक ठरले.
यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
पृथ्वी शाॅ आजच्या शतकाने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या हंगामात त्याने तब्बल ७५४ धावा काढल्या आहेत. यात त्याची २५१.३३ अशी अवाक करणारी सरासरी आहे. इतकेच नव्हे तर त्याने आक्रमक फलंदाजी केल्याने १३५.१२ चा स्ट्राईक रेट देखील राखला आहे. त्याच्या या जबरदस्त फॉर्ममुळे विजय हजारे ट्रॉफीमध्ये सध्या तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पृथ्वीनंतर कर्नाटकाचा डावखुरा सलामीवीर देवदत्त पड्डिकल ६७३ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.
एका हंगामात सर्वाधिक शतके
आजच्या सामन्यातील शतक हे पृथ्वीचे यंदाच्या हंगामातील चौथे शतक ठरले. यासह विजय हजारे ट्रॉफीच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. यापूर्वी एकाच हंगामात चार शतके ठोकण्याचा पराक्रम विराट कोहलीने २००७-०८च्या हंगामात केला होता. तर देवदत्त पड्डिकलनेही या हंगामात चार शतके ठोकण्याची किमया केली. पृथ्वीने आजच्या शतकाने या दोघांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
एकाच हंगामात ७००हून अधिक धावा
पृथ्वीने आजच्या शतकाने यंदाच्या हंगामात एकूण धावा करण्यात ७०० धावांची वेस ओलांडली. असे करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी केवळ मयंक अगरवालने विजय हजारे ट्रॉफीच्या २०१७-१८ सालच्या हंगामात ही कामगिरी साध्य केली होती.
दरम्यान, कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई कर्णधार पृथ्वी शाॅ शतकाने मजबूत स्थितीत आहे. या उपांत्य सामन्यात मुंबईने पृथ्वीच्या शतकाच्या जोरावर ३०० धावांची वेस ओलांडली आहे. मात्र ४९.२ षटकात त्यांचा डाव ३२२ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे कर्नाटकला अंतिम फेरीत जाण्यासाठी ३२३ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
वाढदिवस विशेष : कॅरम बॉलचा जनक अजंथा मेंडिस
इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत भुवनेश्वर बजावेल महत्वपूर्ण भूमिका, माजी भारतीय क्रिकेटपटूचे विधान