येत्या जून महिन्यात आयसीसी आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड या तुल्यबळ संघात ही चुरशीची लढत रंगणार आहे. पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता बनण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून भारतीय संघ मेहनत घेत आहे. त्यांच्या इथवरच्या प्रवासात भारताचा ३४ वर्षीय फिरकीपटू आर अश्विन याचे मोलाचे योगदान राहिले आहे.
याच अश्विनला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात मोठा किर्तीमान करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. हा किर्तीमान करत तो कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अव्वल गोलंदाज बनू शकतो.
अश्विनने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत एकूण १३ सामने खेळताना ६७ विकेट्स घेतल्या आहेत. यासह तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हे अश्विनच्या पुढे आहेत. ब्रॉड १७ सामन्यात ६९ विकेट्स घेत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर कमिन्स १४ सामन्यात सर्वाधिक ७० विकेट्स घेत अव्वलस्थानी विराजमान आहे.
जर कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली; तर तो या दोन्ही गोलंदाजांना पिछाडीवर सोडू शकतो. यासाठी त्याला केवळ ४ विकेट्स चटकावण्याची आवश्यकता आहे. अश्विनव्यतिरिक्त न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदीचीही अव्वलस्थानावर नजर असणार आहे. परंतु यासाठी त्याला तब्बल २० विकेट्सची गरज आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा किर्तीमान करणे जवळपास अशक्यप्राय आहे.
अशात अश्विन ४ विकेट्स घेत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना स्वतसाठी अविस्मरणीय बनवेल की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी कर्णधाराचा आपल्याच संघावर अविश्वास; म्हणे, ‘पाकिस्तान वगळता ‘हे’ संघ टी२० विश्वचषकाचे मानकरी’
इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूची दुरावस्था, कोरोनामुक्त होऊनही म्हणतोय अजूनही बाधित असल्यासारखं वाटतंय