भारताचा माजी कर्णधार आणि विश्वचषक विजेत्या संघाचा मुख्य प्रशिक्षक राहिल द्रविड यांनी टी२० क्रिकेटमधील बदलत चाललेली फलंदाजीची पद्धत याबद्दल गोलंदाजांना इशारा दिला आहे. सध्या अनेक खेळाडू आक्रमक फलंदाजीला सुरूवात करत गोलंदाजांना चकित करत आहेत. त्यांना फलंदाजांच्या बदलच्या शैलीशी जुळवून घेण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, असे मत द्रविड यांनी व्यक्त केले आहे.
द्रविड यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारताने दुसरा टी२० विश्वचषक (२०२४) जिंकण्याची कामगिरी केली होती. सध्या ते डब्लिनमध्ये असून त्यांनी माध्यामांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, प्रियांश आर्य यांसारख्या युवा खेळाडूंनी तसेच जगातील टी२० मधील क्रमांक एकचा फलंदाज अभिषेक शर्मा यांनी पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे.”
“गेल्या दोन-तीन वर्षांत फलंदाजीमध्ये झालेले बदल पाहता, मला वाटते टी२० फॉरमॅटमध्ये गोलंदाजांना हळूहळू योग्य पातळीवर पोहोचण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजांना त्यांच्या कौशल्यावर काम करत राहावे लागेल”, असेही द्रविडने पुढे म्हटले आहे.
द्रविडने फलंदाजांचे कौतुक करताना म्हटले, “मला वाटते की फलंदाजीच्या कौशल्यात षटकार मारण्याच्या क्षमतेत आणि मैदानाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फटके मारण्याच्या क्षमतेत निश्चितपणे खूप सुधारणा झाली आहे. गोलंदाजांनीही त्यांचे कौशल्य सातत्याने सुधारावे. मला खात्री आहे की त्यांच्यापैकी काही जण अजूनही स्वत:ला सिद्ध करून आपले स्थान टिकून ठेवतील.”
गोलंंदाजीत बदल होतील असे स्पष्ट करताना द्रविडने म्हटले, “गोलंदाजांपेक्षा फलंदाजांनी टी२० खेळाच्या मागण्याशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेतले आहे, मात्र पुढील दोन-तीन वर्षांत परिस्थिती बदलू शकते. आजच्या कसोटी क्रिकेटकडे पाहिल्यास जवळपास प्रत्येक कसोटी सामन्याचा निकाल लागतो. त्यामुळे आपण पाहत असलेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे.”
नुकतेच द्रविडची युरोपियन टी२० प्रीमियर लीग (ETPL) डब्लिन फ्रॅंचायजीचा मालक म्हणून अधिकृत घोषणा केली आहे. संघाचे नाव डब्लिन गार्डियन्स असे ठेवण्यात आले असून आर अश्विन हा या संघाचा कर्णधार असणार आहे.






