वेस्ट इंडीज संघाविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिलक वर्मा याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अशातच रविचंद्रन अश्विन याने संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडे अशी मागणी केली आहे की, तिलक वर्माला आगामी वनडे विश्वचषकात खेळण्याची संधी द्यावी. अश्विनसोबतच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर यालाही असेच वाटते.
यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी अद्याप भारताचा संघ निश्चित झाल्याचे दिसत नाही. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) हे दोन प्रमुख खेळाडू अद्याप दुखापतीतून सावले नाहीत, असेच दिसते. मागच्या मोठ्या काळापासून या दोघांना दुखापतीमुळे भारतासाठी खेळता आले नाहीये. अशात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि वसीम जाफर (Wasim Jaffer) या दोन्ही दिग्गजांच्या मते, तिलक वर्मा (Tilak Verma) विश्वचषकात भारतीय संघाची फलंदाजी मजबूत बनवू शकतो. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पदार्पणाच्या टी-20 मालिकेत तिलक वर्माने 39, 50 आणि 49 धावा केल्या आहेत.
अश्विन आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला, “विश्वचषकासाठी त्याची (तिलक वर्मा) दावेदारी भक्कम आहे. आपल्याकडे पुरेसे फलंदाज नसतील, तर पर्यायी खेळाडू म्हणून मी तिलक वर्माला संधी देऊ शकतो. संजू सॅमसन यानेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. पण तिलक वर्मा डावखूरा फलंदाज आहे आणि संघात डावखुऱ्या फलंदाजांची कमी आहे. पहिल्या सात खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा एकमेव डावखुरा खेळाडू आहे.” अश्विनने तिलक वर्माला निवडण्यामागे एक तर्क असाली लावला की, बहुतांश संघांकडे डावखुऱ्या फलंदाजांना अडचणीत आणतील असे फिरकीपटू उपलब्ध नाहीत.
“सर्व चांगल्या संघांमध्ये पाहा. ऑस्ट्रेलियाकडे एश्टन एगर आहे. इंग्लंडकडे मोईन अली आणि लेग स्पिनर आदिल राशिद आहे. बहुतांश संघांकडे डावखुऱ्या फलंदाजांना आव्हान देण्यासाठी फिरकी गोलंदाज नाहीत. यामुळेच तिलक वर्मा महत्वाचा आहे,” असे अश्विन पुढे म्हणाला.
दुसरीकडे एका माध्यमावर बोलताना वसीम जाफर यानेही संघात तिलकला संधी मिळण्याचे कारण स्पष्ट खेले. जाफरच्या मते विश्वचषकापूर्वी राहुल आणि अय्यरने काही सामने खेळणे अपेक्षित होते. पण सध्या तसे होताना दिसत नाहीये. अशात तिलक वर्मा संघासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. “आपली इच्छा असते की, खेळाडूला 15 ते 20 सामने खेळायला मिळावे. आपल्याला आशा होती की, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया चषकात खेळतील. पण आपण वाचत आहोत की, ते दोघे आशिया चषकासाठी तयारत नाहीत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही ते खेळतील की नाही, हे सांगता येणार नाही. कारण त्यांची दुखापत किती गंभीर आहे, याची कुठलीच कल्पना आपल्याला नाही,” असे जाफर म्हणाला.
भारताचा माजी सलामीवीर पुढे असेही म्हणाला की, “जर तुम्हाला एखाद्या खेळाडूला तपासून घ्यायचेच आहे, तर तो तिलक वर्मा का नको? सध्यास्थितीत जो कोणी खेळाडू खेळेल, तो पूर्णपणे तयार नसेल. अशात तिलक वर्माला संधी का दिली जाऊ नेय. त्याच्यावर डाव खेळला पाहिजे.” (Ravichandran Ashwin and Wasim Jaffer urge selectors to give Tilak Verma a chance in World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
लंडनमधील द्विशतकानंतर पृथ्वी शॉ करणार टीम इंडियात पुनरागमन? सलामीवीराची खास प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची संपत्ती फक्त ‘एवढीच’, आकडा विराटच्या निम्म्या संपत्तीपेक्षाही कमी